जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

 ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा 

जीवनज्योती कृषी डायरी - २        https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html



एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था  मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती. 

बाकी सगळ्या गोष्टींसारखं हेही चित्र बदललं. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणं आलं. कारखान्यात तयार होणारी खताची पोती ‘’उज्ज्वल, सुफल’’ पिकांची स्वप्ने दाखवू लागली. पाणीपुरवठ्यासाठी पंप आले. भरपूर आलेल्या पिकाने आपल्यासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशाची भूक भागली. एकेकाळी दुष्काळात बाहेरच्या देशातून धान्य आणावं लागत होतं, तिथे आता कोठारं भरून वाहू लागली. ह्या खतं, कीटकनाशकांनी काही प्रश्न संपवले आणि काही निर्माणही केले. धान्याची चव बदलली, जमिनीचा कस कमी झाला. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे रोगराईला निमंत्रण मिळते, असं मत काही तज्ज्ञांनी मांडलं. 

पूर्ण वेळ शेती करणं हा विचार पक्का झाल्यावर शेती म्हणजे नक्की काय करायचं ह्या दृष्टीने विचार सुरु केला. काय करायचं नाही, हे ठरवणं जरी सोपं असलं तरी काय करायचं हे ठरवणं सोपं नव्हतं. कारणशेतीहा सर्वसमावेशक शब्द आहे. तांदूळ-गहू-डाळी-भाज्या-परदेशी भाज्या-औषधी वनस्पती-फळं ह्यातलं काहीही किंवा हे सगळंशेतीह्या शब्दाखाली येऊ शकतं. 

आम्ही पिढीजात शेतकरी नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे  जे पारंपरिक ज्ञान मिळतं, तसं काही मिळालं नव्हतं. आमच्या आधीच्या पिढ्यांनी शेतीत हात पोळून घेऊन नोकरीचा ठराविक उत्पन्न देणारा सुरक्षित रस्ता धरला होता. आमचा हा प्रवास त्या अर्थाने उलट दिशेचा होता. शेतजमीन घेऊन तशी बरीच वर्षं झाली होती. तेव्हा फळझाडं लावली होती. भाजी किंवा अन्य पिकं घेत नव्हतो. ती सुरवात करायची तर नवीन माहिती मिळवणं गरजेचं झालं. फळांचं उत्पन्न चांगलं मिळतं पण वर्षभर हंगाम असणारी फळं कमी असतात. आंब्यासारख्या फळाचं उत्पन्न (जर मिळालं तर) वर्षात एकदाच मिळतं. भाजी वर्षभर आणि सगळ्यांनाच लागते, म्हणून भाजीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. 

यू-ट्यूबवर शेतीविषयक देशी-परदेशी असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते बघायला लागलो.लाखोंका पॅकेज ठुकराकर इंजिनियर कर रहा है ऑरगॅनिक खेतीअशा प्रकारच्या सक्सेस स्टोरी असायच्या. ते बघताना सगळं फार सहजसोपं वाटायचं. परदेशातले व्हिडिओ बघताना यंत्राधारित शेती बघताना, इतक्या प्रचंड मोठ्या शेतीचं व्यवस्थापन एक-दोन माणसं कसं सांभाळतात, असा अचंबा वाटायचा. हे सगळं छान होतं. पण हे सगळे यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी सांगत होते. त्या मुक्कामापर्यंत पोचताना कोणते काटेकुटे पार करावे लागले, किती नुकसान झालं, सुरवात केल्यापासून नफ्याचा जमाखर्च जुळेपर्यंत किती वर्ष लागली, हे कोणी सांगत नव्हतं.

ते शोधतानाच मध्य प्रदेशातील आकाश चौरसिया ह्या प्रगतिशील शेतकऱ्याच्या बहुस्तरीय शेतीचे काही व्हिडिओ बघितले. एका वेळी जास्तीतजास्त पिके कशी घेता येतील, कुठली पिके लावायची ह्याचं नियोजन कसं करायचं, हे सोप्या पद्धतीने सांगितलं होतं. वर्षभर पाठोपाठ उत्पादन मिळत राहील आणि भांडवली खर्च कमी होईल, अशी माहिती मिळाली. 

त्यांच्या तंत्रात ते फेब्रुवारीच्या सुरवातीला वर्षाचं नियोजन करतात. जागेवर एकाआड एक असे पिकाचे आणि चालायच्या जागेचे पट्टे करतात. पिकाच्या जागेत विशिष्ट अंतरावर बांबू उभे करून त्याचा मांडव तयार करतात. त्या बांबूंच्या मांडवावर नारळाच्या झावळ्या किंवा आधीच्या पिकाचे शिल्लक दांडे ह्यांचं छप्पर तयार करतात. उभ्या बांबूंना तारा बांधून जाळी करतात. मांडवाच्या बाहेरच्या बाजूने सात फूट उंचीपर्यंत साड्या किंवा ग्रीन नेट बांधतात. हे सगळं करण्याचे बरेच फायदे आहेत. बाजूने साड्या आणि वरून छप्पर असल्यामुळे आत उन्हाळ्यातही थोडा गारवा राहतो. हवेबरोबर उडून येणारं गवताचं बी अडवलं जातं. पिकांचं नुकसान करणारे कीटक सहा फूट उंचीच्या खालीच उडत असतात. ते कीटक किंवा लहान प्राणीही आत शिरू शकत नाहीत. वरच्या आणि बाजूच्या आच्छादनामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.

आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परदेशात अक्षरशः हजारो एकर जमिनी असलेले शेतकरी असतात. आपल्याकडे सरासरी दोन ते अडीच एकर जमीन शेतकऱ्याकडे असते. ह्या तंत्राने कमी जागेत जास्त पीक घेता येतं. गवताचं बी अडवलं गेल्यामुळे तणाचं प्रमाण कमी होतं. तण काढण्यासाठी उचलून पैसे द्यावे लागत नाहीत. कमी क्षेत्रात बरीच पिकं असल्याने पाण्याची, खताची बचत होते. बांबू तसंच मांडवावर टाकायचं आच्छादन शेतातूनच येतं. बाजूला बांधायच्या साड्या जुन्या चालतात. भांडवली खर्च बेतात राहतो.   

पिकांची लागवड करताना जमिनीच्या खाली आलं किंवा हळद लावतात. जमिनीवर भरपूर प्रमाणात पालेभाजीचं बी पसरवतात. मांडवाच्या आधाराने वेलभाज्या लावतात. त्यातही लहान पानं असलेल्या वेळी मांडवाच्या वर जातात आणि मोठी पानं असलेल्या वेली बाजूने लावतात. कडेला पपईची झाडं लावतात. दोन ते तीन आठवड्यात पालेभाज्या येऊ लागतात. त्याचं उत्पन्न दोन-अडीच महिने चालू राहतं. पालेभाज्या संपल्या की तिथे हळद-आलं उगवायला लागतं. शिवाय वेलभाज्यांचं उत्पन्नही सुरू होतं. ते पुढे तीन-चार महिने चालू असतं. सहा महिन्यात पपईला फळं येऊ लागतात. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान हळद-आलं तयार होतं. बाजारात चांगला भाव मिळेल तसं विकता येतं. त्याजागी फळभाज्या लावता येतात. असं ते चक्र सुरू राहतं. 

सुरवातीचं चित्र

आम्हीही ही पद्धत वापरायची ठरवली. पण सुरुवात असल्यामुळे काही चुका झाल्या. बांबू जरा जास्त अंतरावर लावले. ते बांबू तेवढे मजबूतही नव्हते. त्यामुळे मांडव जरा डळमळीत झाला. बाजूने लावायला पुरेशा साड्या जमल्या नाहीत. काही भागात बांधल्या. पण त्या वाऱ्याने फाटून गेल्या. पालेभाजी उगवायला लागली आणि लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमधले पहिले दोन-अडीच महिने जाऊच शकलो नाही. तोवर पालेभाजी जून होऊन वाया गेली. पास मिळून पुन्हा जायला लागलो आणि थोड्याच दिवसात निसर्ग वादळाचा फटका बसला. बराचसा मांडव चांगले वाढलेले वेल बरोबर घेऊन आडवा झाला. 



लॉकडाउनच्या आधीचा फोटो आहे. पालक उगवायला सुरवात झाली होती.

 

निसर्ग वादळ येऊन गेल्यानंतर. मांडवाचं नुकसान झालं. बांधलेल्या तारा कोसळलेल्या दिसत आहेत.

नुकतीच उगवलेली हळद

 सद्यस्थितीतील हळद

 आता सध्या तिथे हळद, आलं आहे आणि थोडे वेल आहे . काय काय अडचणी येऊ शकतात, ह्याचं ज्ञान सुरवातीलाच मिळालं. जगात काहीच फुकट शिकायला मिळत नाही. कधी पैसे, कधी कष्ट, कधी शिव्या खाणे, कधी निराशा अशा कुठल्याना कुठल्या स्वरूपात ट्यूशन फी प्रत्येकाला भरावीच लागते. 

आम्ही ही सगळी फी बिगरी यत्तेची प्रवेश फी म्हणून भरली आहे.

*********************************************************

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी ह्या मालिकेतील पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंक बघा 

https://aparnachipane.blogspot.com/2021/05/blog-post_21.html

Comments

  1. सुंदर लिहिलंय . 👌👌

    ReplyDelete
  2. जिज्ञासु वृत्ती व कुतूहल व नावीन्याची कास काय करु शकते हे आपण उभयतांनी दाखवलं व निश्चीत उल्लेखनीय छान घडु पहातय तुमच्या कडुन. शुभेच्छा ह्या नवीन प्रकल्पासाठी

    ReplyDelete
    Replies
    1. संजय, तुमच्या प्रतिक्रियेने हुरूप वाढला. शेती करणं सोपं नाही, हे रोज लक्षात येतं. आपल्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी हव्यात.

      Delete
  3. छान लिहीलंय .... पीके गमावली त्यातून बरंच काही कमवलंही असेल.... मातीशी जुळण्यातून मिळालेला आनंद वै ... त्याचा शरीरावर व मनावर सकारात्मक परिणाम नक्कीच होतो ना .... कुंडीतल्या रोपाला चार टमाटे आले तरी कोण आनंद होतो व त्या टमाट्याच्या कोशिंबीरीची चवही काही औरच असते ... तुमच्या उलट्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. मंजूताई, प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. शिकायला खूप मिळालं. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघूया, ही जिद्दही निर्माण झाली आहे. माझं नातं मातीशी जुळेल, असं कधीही वाटलं नव्हतं. पण जुळलं! तुमच्या शुभेच्छांची खूप गरज आहे. धन्यवाद

      Delete
  4. नवीन क्षेत्रात प्रवेश करायला हिम्मत आणि मेहनतीची तयारी लागते. तुमचे कौतुक वाटले. आणि अशा प्रकारे तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोचवून ही तू छान काम करते आहेस. तुम्हाला खूप शुभेच्छा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५