पुष्पदरी आणि सात भटके भाग २ - पुणे ते हृषीकेश
पुण्याहून दिल्लीपर्यंत विमानाने गेलं तर दीड तासाचा प्रवास आहे. ट्रेनने गेलं तर +/- चोवीस तास. दुरांतो एक्सप्रेससारख्या आधुनिक-गतिमान ट्रेन चोवीस तासांच्या आत पोचवतात. पुणे-दिल्ली प्रवासाची आद्य ट्रेन झेलम एक्सप्रेस निवांत पोचते. आम्ही दुरान्तोने जाणार होतो. त्यामुळे सुखाचा, सुरक्षित प्रवास होता. अगदी थोड्या स्टेशनवर थांबत असल्याने आणि पूर्ण ट्रेन फक्त रिझर्वेशनच्या डब्यांची असल्याने अधेमधे चढून त्रास देणारे प्रवासी नव्हते. जेवण मिळत असल्याने डबे न्यायचा व्याप नव्हता. सगळ्यांनी वेळेवर पुणे स्टेशन गाठलं. घर सोडण्याआधी जी काही चलबिचल होत असते, ती प्रवास सुरू झाला, की संपते. सगळ्यांचे बर्थ रेल्वेच्या आणि रेल कर्मचारी असलेल्या मैत्रिणीच्या कृपेने एकाच कंपार्टमेंटमध्ये आले होते. सामान लावून झाल्यावर आरामात पाय पसरून बसलो. पाचातल्या चौघी कल्याण-मुंबईतल्या. त्यामुळे त्या दिशेने ट्रेन-दौड सुरू झाल्यावर ओळखीच्या रस्त्याला लागल्यासारखं वाटायला लागलं. नंतर पश्चिम रेल्वेच्या रुळांवरून जाताना लहानपणी केलेले कल्याण-डहाणू प्रवास आठवले. आता डहाणूला कोणी नाही. पण तरी धावत्या ट्रेनमधून डहाणू रोड स्टेशन ड...