माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-११ (गाला ते पुणे)

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा 

भाग १० : लिपूलेख खिंड ते गाला https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post_30.html

दिनांक ६ जुलै २०११ (गाला ते पुणे)


ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा आजचा मुक्काम सिरखा’ ह्या कँपला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायचं नक्की केलं होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होतेतेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतोअशी कुरकूर चालू होती. 




यात्रींना मात्र एक दिवस लवकर पोचता येईल तर चांगल होईल, असं वाटत होतं. आज चालण्याचा शेवटचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा संपणार होता. धारचुला, जागेश्वर, दिल्ली असे तीन मुक्काम झाले, की सगळे आपापल्या घरची वाट पकडणार होते. यात्रा संपत आल्याची हुरहूर आणि घरी जायची वेळ जवळ आली, म्हणून आनंद अशा संमिश्र भावना मनात येत होत्या.


ह्या क्षणी मात्र ह्या विचारात रमण्यापेक्षा २० किलोमीटर चालण्याकडे लक्ष देणं भाग होत. आता पायाला आलेले फोड चांगले अक्राळविक्राळ झाले होते. चालताना नेमका तिथे दगड टोचला की मरणाच्या वेदना होत होत्या. पण मला साधारणपणे प्रत्येक ट्रेकला हा त्रास होतोच. त्यामुळे त्याबद्दलची मानसिक तयारी चांगली होती.

कँपवर चहा-पाणी उरकून आम्ही निघालो. थोडं अंतर चालत नाही, तर सर्वात पुढे चालणाऱ्या यात्रींच्या अगदी डोळ्यासमोर डोंगराचा काही भाग मोठा आवाज करत धाडकन कोसळला. सगळे जण हादरलेच. आपण घरी असताना दरड कोसळलीअश्या बातम्या ऐकत असतो. पण प्रत्यक्ष पहिल्याशिवाय त्यातली भयानकता समजत नाही. त्या ढिगाऱ्याच्या बाजूने हळूहळू आम्ही पुढे निघालो. अगदी अरुंद असा खडकाळ रस्ता उतरायचा होता. आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे तो रस्ता निसरडा झाला होता. एक-एक पाऊल मोजून-मापून टाकत तोल सांभाळून चालणे म्हणजे एक दिव्यच होते.



डाव्या बाजूला शुभ्रदुधाळ सिमखोला नदीचा प्रचंड खळखळाट करणारा प्रवाह दिसत होता. वीसेक दिवसांपूर्वी आम्ही ह्याच रस्त्यावरून गेलो होतो. तेव्हा ह्या नदीला जवळपास काहीच पाणी नव्हते. आम्ही प्रवाहातल्या खडकांवरून नदी आरामात पार केली होती. मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसाने ती दुथडी भरून वाहत होती. अरुंद आणि भितीदायक अश्या पुलावरून नदी पार करायची कसरत बूट ओले न होऊ देता तोल सावरत करायची होती. अवघडच होते! पाठोपाठ येणारा यात्रींचा जथ्था इथे येऊन अडकला. त्या गडबडीत सुरेशभाईने मला पटकन पुढे काढले आणि यशस्वीरीत्या तो डगमगता पूल पार करून आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.

आता रुंगलिंग टॉपची चढण चढायची होती. माझ्या आठवणीप्रमाणे ही शेवटची मोठी चढाई होती. नंतरचा रस्ता तसा साधा-सरळ होता. अर्थात मला दमून थांबायला २०-२५ फुटांची चढणही पुष्कळ होते!! कुठल्यातरी दुष्ट माणसाने कुठलीतरी भयानक जादू करून ती चढाई आम्ही आलो, त्यापेक्षा दुप्पट करून ठेवली होती. भरीत भर म्हणून पावसाची भुरभूर चालू होती. मी खरोखर दमले होते. पाय, गुढघे, मांड्या सगळं ठणकत होत. पाठीवर ओझं नसलं तरी चालताना वाट लागत होती. पण घोड्यावर बसायचं नाही, हा निश्चय शेवटच्या दिवशी मोडायला जीवावर येत होतं. त्यामुळे तशीच जिद्दीने चालत राहिले. फार कठीण रस्ता आला, की सुरेशभाई न सांगता हात धरायचा. असं पाय ओढत, धापा टाकत जवळपास जगाच्या अंतापर्यंत चालल्यावर एकदाचा तो रुंगलिंग टॉप आला.




पाच मिनिटे तिथे बसून राहिले. मी चढत असताना कितीतरी चालणारे किंवा घोड्यावरचे यात्री पुढे गेले होते. त्यांना गाठण्यासाठी वेग वाढवणे माझ्या शक्तीबाहेरच काम होत. जवळच पाणी पिऊन जरा हुशारी आल्यावर मी पुन्हा चालायला तयार झाले. आता प्राण कंठाशी येईपर्यंत चढल्यावर अर्थातच प्रचंड उतार होता. ट्रेकिंगमधला हा फार त्रासदायक भाग असतो. धाप लागेपर्यंत चढा आणि गुडघे दुखेपर्यंत उतरा. संपूर्ण परीक्षेत हे दोनच आणि तेही अनिवार्य प्रश्न असतात!!

आताचा उतार जोरदारच होता. सुरेशभाई माझा हात घट्ट पकडला, आणि आम्ही उतरायला लागलो. वाट अरुंद असल्याने तो बिचारा चिखलात पाय बरबटून घेत होता, आणि मी त्यातल्या त्यात बऱ्या रस्त्याने चालत होते. भराभर आम्ही खालच्या उंचीवर येत होतो. उतरता उतरता आमची नाश्त्याची जागा आली. छोले आणि पुरी ह्याचा समाचार घेऊन पंधरा मिनिटातच पुढे निघालो. पूर्ण यात्रेचा हिशोब केला, तर छोले-राजमा-बटाटे आणि पुऱ्या ह्यांचा पुढच्या कमीतकमी दहा वर्षांचा कोटा संपला होता!


माझ्या चालण्याच्या शक्तीचा अंत होऊन त्यावर काही किलोमीटर झाले होते. छोटासा चढसुद्धा प्रचंड वाटत होता. सिरखा कँप काही अजून दृष्टिपथात येत नव्हता. आज मी सुरेशभाईला सगळ्यात जास्त वेळा अभी कितना चलना है?’ हा माझा अतिशय आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला असेल. तो शांतपणे अब थोडाही बच गया| आरामसे चलो|’ अशी समजूत घालत राहायचा! पहिल्या दिवशी अगदी ताठपणे तरातरा चालणारे बहुतेक सगळेच यात्री एव्हाना माझ्यासारखेच ढेपाळले होते.

असंच कसंबसं चालताना अचानक समोर कँप दिसला! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. पाऊस नव्हता पण हवेत धुकं होत. त्या हवेत तो कँप मला आणखीनच स्वप्नवत वाटला. जेवण तयार होतं. सर्वांनी त्या गार हवेत गरमागरम जेवणावर ताव मारला. येताना आम्ही नारायण आश्रमापासून चालायला सुरवात केली होती. त्या रस्त्यावर दरड कोसळल्याने तो रस्ता बंद होता. सोसानावाच्या दुसऱ्या गावापासून जीपची सोय होऊ शकते, असा निरोप नारंग सरांना आला होता. पण त्याही रस्त्यावर काही अडचण आहे, अशी बातमी पोर्टर टाइम्समध्ये आली होती.





शेवटी सोसापर्यंत जाऊन बघू, नाहीच जमलं, तर परत सिरखा कँपला येऊन मुक्काम करू, असा सगळ्या बॅचने निर्णय घेतला. सगळे पुन्हा चालायला लागले. हवा चांगल्यापैकी सुधारली होती. माझा पोनीवाला रमेशभाई सिरखा गावातला होता. मी तशीही घोड्यावर बसणार नव्हते, मग त्याची वरात सोसापर्यंत कशाला, अश्या विचाराने मी त्याला तिथेच त्याचे पैसे, काही कपडे आणि त्याच्या मुलांसाठी खाऊ देऊन निरोप दिला. यात्रेतले एक-एक बंध आता संपत चालले, ह्या विचाराने डोळ्यात पाणी येत होत. दिदी ठीकसे घर जाना, अगले टाइम बेटेको लेके आनाअसा आपुलकीचा निरोप घेऊन आणि त्याचा चहाचा प्रेमळ आग्रह कसाबसा नाकारून मी पुढे निघाले.

तासभर चालल्यावर सोसा गाव दिसायला लागलं. क्युबीस्टपद्धतीच चित्र असावं, अस ते गाव दिसत होत. आमच्यातल्या बऱ्याच जणांना परत त्या कृत्रिम, धावपळीच्या जगात न जाता इथेच ह्या खेड्यात शांत-निरामय आयुष्य जगावं, असा मोह होत होता.


एका जागेवरून आमचा जीप पॉईंट दिसायला लागला. चालण्याचा शेवट अगदी दृष्टिपथात आला. खरंच का मी इतका प्रवास केला? माझा माझ्यावर विश्वास बसेना. शारीरिक ताकद खरंतर केव्हाच संपली होती. मनाच्या ताकदीवर केवढातरी प्रवास झाला. उतारावरून भराभर उतरत लगेचच आम्ही सोसा गावात पोचलो. सगळे अगदी उत्साहात होते. काही यात्री जीपमध्ये बसून आधीच रवाना झाले होते. नारंग सर जश्या जीप येतील, तसे यात्री पुढे पाठवत होते.


आता माझ्याबरोबर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालावीशी हाती धरोनियाअश्या सोबत्याचा, सुरेशभाईचा निरोप घेण्याची वेळ आली. त्यालाही पैसे, कपडे, खाऊ दिला. माझी यात्रा नीटपणे होण्यात त्याचा फार मोठा वाटा होता. थोड्याच वेळात आमची जीप आली. वडाप पद्धतीने कोंबून दहाजण एका जीपमध्ये बसलो. आमचे पोर्टर टपावर स्वार झाले, त्यात सुरेशभाईही होता. जीपमध्ये बसल्यावर मी लगेच माझे चालायचे बूट ओरबाडून काढले आणि साध्या चपला घातल्या! पायांना इतकं बरं वाटलं की बस्स!

घाटातला वळणा-वळणांचा प्रवास होता. आता ही दृश्य मी डोळे भरून पाहत होते, एकीकडे डोळे भरूनही येत होते. रस्त्यात एक दरड कोसळली होती. तेवढा भाग चालत जाऊन पुढे दुसऱ्या जीपमध्ये बसायचं होत. आता पोर्टरांना वर बसता येणार नव्हत. ते तिथेच उतरले. पण तेवढ्यातही सुरेशभाईने माझी सॅक टपावर चढवून दिली. ठीक है दिदी, ओम् नमः शिवायअस म्हणून निरोप घेतला. आता तो मला भेटणार नव्हता. पण त्याची आठवण मात्र सदैव माझ्या मनात राहील.


धारचूलाच्या यात्री निवासमध्ये पोचलो, तर आधी पोचलेले यात्री अंघोळ वगैरे करून तयार! चांगल्या-चुंगल्या कपड्यातले लोक ओळखायलाच येईनात. बहुधा अती ऑक्सिजनचा मारा झाल्याने सगळ्यांचे मेंदू गडबडले होते. सगळीकडून हास्याचे फवारे उडत होते. मोबाईल ह्या सोयीचा खूप दिवसांचा विरह झाला होता. आता मोबाईल सुरू झाले म्हटल्यावर मी दणादणा फोन करून गप्पा मारून घेतल्या. जाताना इथे जमा केलेलं सामान परत मिळाल. त्यातले स्वच्छ कपडे घातले. अशी शहराकडे जायची तयारी करू लागले.

रात्री जेवताना नारंग सरांनी सगळ्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. रूढ अर्थाने आमची यात्रा आता संपली होती. पुढचे दोन दिवस बसचा प्रवास. दिल्लीत पोचल्यावर लगेचच फाटाफूट होणार. काहीश्या जड मनानेच सगळे आपापल्या खोलीत गेले.

दिनांक ७ जुलै २०११ (धारचुला ते जागेश्वर)



आज आमचा परतीचा बसचा प्रवास सुरू होणार होता. कालच्या रस्त्यात कोसळलेल्या दरडींमुळे आमचं मोठं सामान अजून पोचायचं होत. ते आज रात्री मिळेल अशी बातमी होती. धारचूलामधील एक पूल ओलांडला की आपण नेपाळमध्ये जाऊ शकतो. दिवसा कोणीही ये-जा करू शकतात. नेपाळमध्ये भारतापेक्षा कपडे स्वस्त असतात अशी माहिती सगळे सांगत होते. सामान पण आलं नाहीये, तर अजून एक दिवस इथेच थांबूया, खरेदीही करता येईल,’ अशी कुरकूर आमच्यातल्या खरेदीप्रेमींनी करून बघितली. पण नारंग सरांनी काही दाद दिली नाही.

२७५ किलोमीटरचा लांबलचक प्रवास करायचा होता. त्यामुळे सकाळी भराभर आवरून आम्ही बसमध्ये बसलो. इतके दिवस चालून पायांची वाट लागली होती. त्या छोट्या बसमध्ये पाय नक्की कसे ठेवावेत हे समजत नव्हत. कसेही ठेवले तरी पाच मिनिटात रग लागायची.

धारचुला पासून जरा बाहेर पडतोय, तोवर दरड कोसळून रस्ता बंद झालेला होता! आम्ही लोक खाली उतरून बाजूला बसून राहिलो. तासाभराने तिथले सां.बा.खात्याचे लोक उगवले. मग मात्र त्यांनी अक्षरशः वीस मिनिटात रस्ता मोकळा केला. थोड्याच वेळात आम्ही आय.टी.बी.पी.च्या मीरथीह्या कँपला पोचलो. जाताना होता, तसाच थाट आताही होता. आम्ही काही युद्ध जिंकून आलो असल्यासारखे ते आमचं कौतुक करत होते. अल्पोपाहार आटोपल्यावर जाताना आमच्या ग्रुपचा जो फोटो काढला होता, त्याची प्रत प्रत्येकाला भेट दिली.




हा सगळा रस्ता छान झाडीतून जाणारा आणि निसर्गरम्य होता. उद्या दुपारपर्यंत आम्ही काठगोदामला आणि रात्री दिल्लीत पोचलो असतो. आता अगदी थोडाच वेळ ह्या सुरेख दृश्यांची सोबत होती. आमचा प्रवास पाताळ भुवनेश्वरकडे चालू होता.

पाताळ भुवनेश्वर ह्या त्या भागातला एक विलक्षण प्रकार आहे. चुनखडीच्या (lime stone) खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे निरनिराळे आकृतिबंध तयार झाले आहेत. आत-बाहेर करायला एका भुयारातून घसरत जावं लागत. आत मात्र चालता येत. गणपती, श्रीशंकर आणि इतर ३३ कोटी देवांचे स्थान इथे आहे, अस म्हणतात. वनवासाच्या काळात पांडवांचे वास्तव्य ह्या गुहांमध्ये झाले होते, अशी श्रद्धा आहे.त्या गुहा वेगळ्याच आणि म्हणून लक्षात राहण्यासारख्या होत्या.

महाराष्ट्रात नाही, पण तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रातून कैलास यात्रेला बरंच महत्त्व असत. त्यातल्याच एका वर्तमानपत्रात नंदिनीचा एक नदी पार करताना फोटो आला होता! मज्जा! बसमधला काही वेळ त्यावर चर्चा करण्यात छान गेला. मग मात्र वेळ जाता जाईना. एक तर सगळा रस्ता वळणावळणाचा. त्यामुळे पु.लं.च्या म्हैससारखी, बसला एका अर्थाने लागणारी वळणप्रवाशांना दुसऱ्या अर्थी लागत होती! प्रत्येकाला आपला पुढचा नंबर लागतोय की काय ही भीती वाटत होती. त्यामुळे तोंड उघडून दुसऱ्याशी बोलायची पण भीती वाटत होती. संध्याकाळ होऊन काळोख झाल्यावर तर बाहेर बघणंही अशक्य झालं. कधी एकदा ते जागेश्वर येईल अस झालं होत. भांडा-भांडी व्हायला अगदी आदर्श परिस्थिती होती. पण सगळे त्या प्रवासाने इतके गळून गेले होते, की भांडायलासुद्धा ताकद शिल्लक नव्हती.

अधून मधून डुलक्या घेताना आपण घरी पोचलोय, आपल्या सवयीच्या बेडवर झोपलोयअशी स्वप्न पडत होती. यात्रेची मजा संपली, हिमालयाची संगत थोडाच वेळ राहिली, अश्या वेळेला घरची आठवण चरचरून येत होती. हॅरी पॉटरसारखी काही जादू येत असती, तर मी त्याच क्षणी घरी गेले असते.
बराच वेळ तो थकवणारा प्रवास करून आम्ही जागेश्वरला पोचलो. नको वाटत होत, तरी चार घास पोटात ढकलून लगेच सगळे गाढ झोपून गेले.

दिनांक ८ जुलै २०११ (जागेश्वर ते दिल्ली)


जागेश्वर इथे एक देवळांचे संकुल आहे. तिथले स्थानिक लोक ते बारा ज्योतिर्लिंगातले पहिले ज्योतिर्लिंग आहे, असे मानतात. ९व्या ते १३व्या शतकात बांधलेली सुरेख दगडी बांधणीची १२४ देवळे तिथे आहेत. दांडेश्वर, चंडिका, कुबेर, मृत्युंजय अशी निरनिराळी मंदिरे तिथे आहेत. आम्ही आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना अश्या जागी स्केचिंगला जायचो, त्याची आठवण आली. अजून प्रवासाचा बराच पल्ला बाकी असल्याने भल्या पहाटे घाईघाईने तयार होऊन दर्शन घेऊन आलो.




पुन्हा एकदा बसप्रवास सुरू झाला. चालून पायांना त्रास झाला नव्हता, इतका त्रास कालपासूनच्या बसच्या प्रवासाने झाला होता. कधी एकदा हा प्रवास संपेल, असं झालं होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही काठगोदामला पोचलो. हे हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं गाव. हिमालयाचा निरोप घेऊन, पर्वतांची साथ सोडून शहरी भागाकडे जायचं होतं. काठगोदामच्या यात्रा समितीने आमचं जोरदार स्वागत करून आम्हाला उत्तम जेवण दिलं. नंतरच्या कार्यक्रमात यात्रा पूर्ण केलेल्यांना भारत सरकारची प्रमाणपत्रं दिली. कार्यक्रम आटोपल्यावर आरामदायी अश्या वोल्वो बसमध्ये बसून आमचा बस प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. कितीतरी दिवसांनी पायांना खूप जागा मिळाली. त्या भव्य लेगस्पेसच काय करावं?’ हेच कळेना. बसमध्ये चक्क पाय हालवता येत होते! इतकं बरं वाटत होत!


पुढचा प्रवास महामार्गावरून सुरु झाला. हिमालयाची शिखरे मागे पडली होती. गाड्यांचे कर्णकर्कश आवाज, गर्दी, अडकलेली वाहतूक, धूळ-धूर, निरनिराळ्या नेत्यांचे चेहरे दाखवणारी होर्डिंग्ज आपण शहराकडे चाललोय ह्याची जाणीव देत होती. आम्ही ठरल्यापेक्षा एक दिवस अगोदर दिल्लीत  पोचणार होतो. माझं परतीच्या प्रवासाचं तिकीट १० तारखेच होत. ठरल्याप्रमाणे १० तारखेला जावं की जास्त पैसे भरून एक दिवस आधीचं, म्हणजे उद्याचंच तिकीट काढावं हा विचार दोन दिवस करत होते.

काठगोदामनंतर केव्हातरी मला अजून एक दिवस दिल्लीत राहण्याचा विचार नकोनको झाला. पुन्हा तो गुजराथ समाज, ती मळकी अंथरूण-पांघरूण, ती गजबज सगळंच. शनिवारी रात्री घरी पोचले, तर रविवारचा दिवस नवरा, मुलगा सगळ्यांबरोबर घालवता येईल, ह्या विचाराचा विजय झाला. शेवटी बरेच जास्तीचे पैसे घालून दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या फ्लाईटचं तिकीट काढलं. अजून चोवीस तासात आपण घरी पोचणार ह्या कल्पनेने जीवाला छान गार वाटत होत.

तीनेक तास प्रवास झाल्यावर गाझियाबाद आलं. इथून आमच्या बॅचची वजाबाकी सुरू झाली. गाझियाबाद आणि परिसरातली मंडळी सगळ्यांचा निरोप घेऊन उतरली. असे यात्री जागोजागी उतरवत उतरवत दिल्लीतल्या गुजराथ समाजला पोचायला जवळजवळ रात्रीचे बारा वाजले. तिथे पोचलो तर अजून एक आश्चर्य आमची वाट बघत होत. यात्रा समितीचे, तसंच यात्रा सुखकर व्हावी म्हणून झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, दिल्लीतल्या यात्रींचे नातेवाईक सगळे एवढ्या रात्रीचे जातीने हजर होते. हर्षभरित नजरेने आमचे स्वागत करत होते. आम्हाला पुष्पहार घालून, मिठाई खायला घालत होते. आम्हाला नमस्कार करत होते. सगळ्यांचे नातेवाईक आम्ही जणू सगळेच त्यांचे नातेवाईक आहोत अश्या आपुलकीने आम्हाला मदत करत होते.

हे सगळं पाहून सगळ्यांना मजा करायची हुक्की आली. मग काय, यात्री, त्यांचे नातेवाईक सगळ्यांनी नाच-गाणी करून आपल्या उत्साहाला वाट करून दिली. हसून-खिदळून झाल्यावर दिल्लीतले यात्री त्यांच्या घरी निघाले. बहुतेकांच्या डोळ्यात पाणी होत. पुन्हा भेटण्याची, संपर्क ठेवण्याची आश्वासन एकमेकांना देत जड पायाने ते लोक गाड्यांमध्ये जाऊन बसले. नारंग सरांच्या पत्नी त्यांना घ्यायला आल्या होत्या. आमच्या बरोबर मित्रासारख्या गप्पा मारणाऱ्या, खेळीमेळीने वागणाऱ्या सरांमुळे आमचे हे दिवस आनंदात गेले. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानले.



उरलेले यात्री पुन्हा एकदा डॉर्मिटरीत गेलो. बरीच रात्र झाली होती. पण कोणालाच झोपायची इच्छा होईना. सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते, हसत होते. महिन्याभराची उजळणी होत होती. आठव्या बॅचचे यात्री शेजारच्या डॉर्मिटरीत झोपले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी मेडीकलसाठी जायचं होतं. त्यांची झोपमोड होऊन त्यांना त्रास होईल, हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या उत्साहाला कसाबसा आवर घालून झोपलो. 

दिनांक ९ जुलै २०११ (दिल्ली ते पुणे)

काही झालं तरी आज लवकर उठायचं नाही, अस मी अगदी पक्कं ठरवलं होत. पण..... आमच्यापासून गेले चार दिवस दुरावलेले आमचं सामान पहाटे पाच वाजता येऊन पोचलं. ते बाहेर रस्त्यावरच आहे, असं कळल्यावर घाई-घाईने उठून सामान घ्यायला जावंच लागलं. सामान आणल्यावर पुन्हा एकदा सगळे सामानात डोकं खुपसून बसले. कोणाकडे जास्तीचे कपडे नाहीत, कोणाचा मोबाईल तर कोणाचा चार्जर मोठ्या सामानात ठेवला गेला होता. ते सगळं परत हातात आल्यामुळे सगळ्या यात्रींमध्ये उत्साहाची लाट आली.

पहाटेच ह्या सगळ्या गोंधळात झोपमोड झाली. राजस्थान, पंजाब अश्या शेजारच्या राज्यातून आलेले यात्री सामान हातात पडताच घरी रवाना होत होते. इतका विलक्षण अनुभव ज्यांच्या साथीने घेतला, त्यांचा निरोप घेताना जड जात होतं. डोळ्यात पाणी येत होतं. भारताच्या निरनिराळ्या राज्यातून आलेल्या ह्या मंडळींची पुन्हा कधी भेट होईल की नाही, हे सुद्धा सांगता येत नाही. रोजच्या जगण्याची धडपड काही चुकत नाही. पण आठवणींच्या सुंदर कप्प्यात हे सगळे जण कायमचे विराजमान असणार, हे नक्की!

मी अंघोळ उरकून सामान पुण्याला नेण्याच्या बेताने भरून टाकलं. आठव्या बॅचचे यात्री तिथे आलेले होते. ते आमच्याकडे आदराने बघत होते. त्याचं शंकासमाधान करण्याची जबाबदारी आमच्यातल्या काही उत्साही यात्रींनी आपण होऊन घेतली होती. ह्या सगळ्या गडबडीत दुपारपर्यंतच वेळ कसा गेला, ते कळलंही नाही. मी आणि पुण्यातले अजून दोन यात्री एकाच विमानाने येणार होतो. सकाळपासूनच मुलाचे सारखे फोन येत होते. आता काय करते आहेस?, कधी निघणार आहेस? मी आणि बाबा तुला घ्यायला येतोय, एयरपोर्टमधून बाहेर पडलीस, की तिथेच थांबह्या आणि अश्या सूचनांचा मारा चालू होता. मी मुलाला इतके दिवस सोडून कधी कुठे गेले नव्हते. आता कधी एकदा त्याला भेटते असं झालं होतं. 

सगळ्यांचा निरोप घेतला. पत्ते-फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. फोटो सारखे चालूच होते. सगळ्यांचे ऋणानुबंध एवढे घट्ट झाले होते, की सामान उचलून निघताना मन आणि डोळे भरून आले. आनंद असो नाहीतर दुःख, भावना पराकोटीची वा परमोच्च असली की तिचे मूर्त स्वरूप किती सारखे असते? दोघांना आधार असतो फक्त अश्रूंचा....

टॅक्सी, विमानतळ आणि विमान हे टप्पे भराभर संपले. बघता बघता मी पुण्यात पोचले सुद्धा!! बाहेर आले तर नवरा आणि मुलगा वाट बघत थांबलेच होते. मुलांचे चेहरे पाहून डोळे निवतात, असं ऐकलं होत. त्याचा प्रत्यय आला. घरी पोचल्यावर एवढी खडतर यात्रा संपवून नीटपणे परत आल्याबद्दल कृतज्ञतेने देवाला, आई-वडिलांना नमस्कार केला. आई-बाबा, नवरा-मुलगा सगळ्याचे चेहरे आनंदाने फुलले होते.

हे असे संपूर्ण आनंदाचे, समाधानी क्षण चिमटीत पकडून ठेवता आले, तर पुढचं सगळं आयुष्य म्हणजे कैलास यात्रेसारखी आनंददायी यात्रा होईल, नाही?

ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा

भाग १२ : यात्रेविषयी थोडे https://aparnachipane.blogspot.com/2019/02/blog-post.html

Comments

  1. तुझं हे वर्णन वाचलं होतच आणि त्या नंतर मी 2022 ला ॐ परबत आदी कैलास टूर ला गेले तेंव्हा या सगळ्या ठिकाणाची नावं तू केलेली वर्णनं आठवत होती. तुमची धारचुला पासून पूर्ण पायी यात्रा होती आणि मी अगदी ओमपरबत जिथून दिसतो तिथपर्यंत आरामात जीप ने गेले होते इतकी रस्त्याची सुविधा आहे. तुझं कैलास यात्रा वर्णन खूपच छान लिहिलं आहेस आणि मधे मधे humor touch असल्याने आणखी छान वाटतं वाचायला. नुसतं इथून तिथे गेलो तिथून तिथे गेलो असं नं मांडता आवश्यक ते डिटेल्स आणि मधे मधे विनोदी वर्णन त्यामुळे मी ही पाने मधे मधे उलटत राहणार हे नक्की

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५