जीवनज्योती कृषी उद्योग डायरी- १

 


पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो. 


हे सगळं रमणीय आहे. गडबड होते ती चिखलात चालावं लागतं तेव्हा! आत्तापर्यंत पाऊस झाला, ते पाणी जमिनीत  मुरलं. आता मातीची तहान भागली. त्यामुळे चिखल भरपूर झालाय. घसरून पडायच्या भीतीने डायनोसॉर चालत असतील, तसं सावकाश आणि पाय दाबत दाबत चालावं लागतंय. काळजी घेऊन लाडाने वाढवलेल्या झाडांपेक्षा नेहमीच गवत आणि तण जोमाने वाढतं. शेतावरच्या सगळ्या मोकळ्या जागा गवत आणि तणाने व्यापल्या आहेत. 


आज गेल्या-गेल्या स्वागताला आली ती माऊची दोन देखणी गोजिरवाणी पिल्लं. ही बाळं आता दोन आठवड्याची झाल्यामुळे इकडेतिकडे भटकायला लागली आहेत. आमची तितकी ओळख नसल्यामुळे चाहूल लागली की पळून जातात आणि त्यांच्या सुरक्षित कोपऱ्यात बसून टुकूटुकू बघत बसतात.




आत्ता शेतावर काकडी, दोडकी, दुधी भोपळा, कारली अशा वेलभाज्या आहेत. शिवाय भुईमूग, तूर-मूग-उडीद आहे. हळदही आहे. काकडीच्या वेलांनी छान जोर धरला आहे. पिवळी फुलं, हिरवीगार पानं आणि डोकावणाऱ्या पांढऱ्या काकड्या. प्रत्येक वेलांची पानंही वेगवेगळी आहेत. काकडीची चरबरीत भरपूर पानं, दुधीभोपळ्याची मोठमोठी आणि स्पर्शाला मऊ पानं, दोडक्याचीही पानं मोठी असतात पण गर्दी नाही. वेल मोकळा दिसतो. कारल्याची नाजूक-नक्षीदार पानं आहेत. बाकी वेलांना वास नाही. पण कारल्याच्या वेलाजवळ कडसर वास येतो. मला तो वास इतका आवडतो की घरीआल्यावरही तो वास मनात रुंजी घालत असतो.



वेलांना नवेनवे फुटवे येत राहतात. नैसर्गिकरित्या त्यांचा ओढा जवळपासच्या जिवंत, हिरव्या झाडांकडे असतो. मग ते मोठं झाड असो नाहीतर गवत किंवा तण. ह्या फुटव्यांना मांडवावर चढवणे, हे माझं दरवेळी करायचं आवडतं काम आहे. उनाड मुलांना आपापल्या जागेवर बसवायच्या उत्साहाने मी दोरी बांधून त्या फुटव्यांना योग्य दिशा दाखवत असते. सगळ्या वेलांच्या मिळून आठ रांगा आहेत. सगळीकडे फिरताफिरता दुपार झाली. 



इतका वेळ पावसाची कृपा होती, त्यामुळे चटचट काम उरकलं. मी वेलांचं काम करत होते तोवर महेश आणि आमच्या शेतावरच्या मदतनिसाची धाकली (म्हणजेच आमची छोटी ताई) ह्या दोघांनी मिळून जीवामृत फवारायचं काम केलं. तेवढ्यात पाऊस आलाच. पाऊस बघत जेवण झालं. पावसामुळे जरा रेंगाळत जेवलो. 


जेवणानंतर दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तोडणीचं काम होतं. मग छोटी ताई आणि मी काकड्या काढायला गेलो. काकड्यांच्या वेलाला इतकी पानं असतात, की एक दिग्दर्शक आणि एक मुख्य कलाकार लागतोच. मी लांबून तिला मोठ्या काकड्या कुठेआहेत, ते दाखवत होते आणि ती पटापट तोडत होती. जवळपास पाच किलो काकड्या निघाल्या. मग थोडी भेंडी, थोड्या तिखटजाळ मिरच्या आणि एका मैत्रिणीने आग्रहाने सांगितलेली हळदीची पानं काढली. विसरले असते तर तिच्या पातोळ्या कशा घडल्या असत्या? 


तिखटजाळ मिरच्या



तिळाचं झाड

काळे तीळ- पांढरे तीळ




ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारा

जीवनज्योती कृषी डायरी - २ https://aparnachipane.blogspot.com/2020/09/2.html

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५