माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-९ (तकलाकोट मुक्काम)

ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा 

भाग ८ : मानस सरोवराची परिक्रमा https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post.html


दिनांक ३० जून २०११ (तकलाकोट मुक्काम)


गेल्या कितीतरी दिवसांपासून चीन हद्दीपर्यंत पोचणे आणि नीटपणे दोन्ही परिक्रमा पार पडणे, ह्याचा (कोणाजवळ कबूल केलं नाही तरी) ताण होताच. यात्रेला येण्याच नक्की ठरवलं, तेव्हापासून जो तो बाकी कोणा-कोणाला आलेल्या अडचणींचा पाढा वाचायचा. व्यवस्थापन, निसर्ग आणि प्रकृती हे तीन प्रमुख खलनायक असायचे! दिल्लीपासून ते गुंजीपर्यंतच्या माहिती आणि सूचना सत्रांनी ही काळजी व्यवस्थित वाढवली होती.


आता हा सगळा ताणाचा भाग पार पडला होता. आता कँपवर उन्हाळ्याच्या सुट्टीसारखं निवांत वातावरण तयार झालं होतं. सगळ्यांच्या ओळखी होऊन तीन आठवडे झाले होते. आम्ही सर्वांनी एकाच वेळी घाबरवणारे आणि कल्पनातीत रौद्रसुंदर असलेले अनुभव घेतले होते. त्या धाग्यांनी सगळे यात्री जोडले गेले होते. आमच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तीन तारखेला लीपुलेख पार करून, आल्या मार्गाने परतून नऊ तारखेला दिल्लीत पोचायचं होतं. सगळ्यांच्या बोलण्यात आता ‘दिल्लीहून कोण कसा जाणार, कोणाच कधीच रिझर्वेशन आहे,’ हे विषय येत होते. घर सोडून इतके दिवस झाल्याच आता चांगलंच जाणवत होतं. परतीच्या प्रवासात एखादा दिवस कमी करता येईल का? अशी चर्चांच्या फेऱ्या नारंग सरांबरोबर चालू होत्या.


आमच्या नारंग सरांनी का कोणास ठाऊक, त्यांच्या पत्नीला ते एक तारखेला दिल्लीत पोचणार आहेत, अस सांगितलं होतं!! ते सगळ्यांना सांगायचे, ’कोई बात नही| मै फोनपे बोल देनेवाला हूं, की वेदर खराब हो गया, इसलिये अटक गये!!’ ते म्हणजे धन्यच होते.  

आज आम्हाला तकलाकोटच्या जवळच जनरल जोरावरसिंग ह्यांची समाधी आहे, ती बघायला जायचं होत. त्यांच्या पराक्रमाबद्दल बहुतेक कोणालाच धड माहिती नव्हती. कोणी ते १९६२ च्या युद्धात हुतात्मा झाले अस सांगत होते. पण शेवटी आमच्यातल्याच एकाने ते गैरसमज दूर केला.


जोरावरसिंग हे काश्मीरचे राजे गुलाब सिंग ह्यांचे सेनापती होते. जनरल जोरावरसिंग म्हणजे पराक्रमाचा धगधगता अंगार होता. त्यांनी आपल्या अचाट पराक्रमाने लडाख, बाल्टीस्थान, गिलगिट हे प्रदेश पादाक्रांत केले होते. तिबेटचा कैलास-मानस सरोवराचा हा प्रदेशही त्यांनी आपल्या भीमपराक्रमाने काश्मीरला जोडला होता. काश्मीरच्या राजानेदेखील त्यांना ‘जनरल’ ही पदवी देऊन आपल्या सेनापतीचा मान ठेवला होता.

त्या वेळी तिबेटच्या राजाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होते. अर्थातच इंग्रजांनी त्यांचे बळ तिबेटी राजाच्या मागे उभे केले. धूर्त असे डाव टाकत, प्रचंड हिमवर्षाव होत असताना इंग्रजांनी जोरावरसिंग ह्यांच्या सैन्यावर हल्ला केला. त्या अनोळखी प्रदेशात निसर्गाने उलटे दान टाकले असताना देखील काश्मिरी सैन्याने आपल्या उमद्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे प्रयत्नांची शिकस्त केली. भाऊबंदकीचा शाप तर भारताला आहेच. तिबेटी आणि इंग्रजी सैन्याच्या कैचीत सापडलेल्या, थंडीने बेजार सैन्यासह लढणाऱ्या ह्या शूरवीराला शेवटी इंग्रजांनी सैन्यात फूट पाडून कपटाने १८४१ च्या लढाईत ठार मारले.

तिबेटी जनतेने आपल्या शत्रूच्या ह्या सेनापतीच्या पराक्रमाची कदर केली. तकलाकोटपासून ८-१० किलोमीटरवर जनरल जोरावरसिंग ह्यांची त्यांच्या इतमामाप्रमाणे भव्य समाधी बांधली. आज त्याचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. आम्ही तिथे थांबलो. सगळ्यांनी मनापासून जनरल जोरावरसिंग ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपले राष्ट्रगीत आणि ‘ए मेरे वतन के लोगो’ म्हटले.


यात्रेला जाण्याआधी मी श्री.मोहन बने ह्यांचे ‘अपूर्ण परिक्रमा’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी ही यात्रा १९९८ मध्ये केली होती. त्यानंतर १३ वर्षांमध्ये सर्वच बाबतीत बराच फरक पडलेला जाणवत होता. त्यांनी केलेल्या तिबेटामधील रस्तांच्या, कँपच्या अवस्थेत फारच चांगला बदल झाला होता. त्यांच्या बसच्या चालकाने त्यांना ही समाधी ‘कार्यक्रमात नाही’ ह्या कारणामुळे बघू दिली नव्हती. आता मात्र आम्ही तिथे ‘जन गण मन’ गाऊ शकत होतो. हा बदल कसा झाला कोण जाणे? सगळे जग आता जवळ आले म्हणून, की भारताचे आणि चीनचे संबंध सुधारले म्हणून? आमच्या बरोबरचे तिबेटी गाईडसुद्धा आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारत होते, खेळीमेळीने वागत होते.

समाधीला भेट देऊन आम्ही परत आलो. जेवलो. लगेच सगळेच्या सगळे यात्री खरेदीच्या दिशेने जवळजवळ पळतच सुटले!! तसं बघितलं, तर तकलाकोट हे सीमेवर असलेलं एक लहान गाव आहे. ते काही शॉपिंग सेंटरसाठी प्रसिद्ध असलेलं शांघाय किंवा बीजिंग नाही. पण ‘जातीच्या खरेदीप्रेमींना काहीही सुंदर’ दिसत असावं! मुलांचे, मोठ्यांचे कपडे, दागिने, तिबेटी पद्धतीच्या शोभेच्या वस्तू, मोबाईल हँडसेट, चामड्याची जाकिटे इतकंच काय पण ब्लँकेट्सची सुद्धा खरेदी लोकांनी केली!



अगदी खरं सांगायचं तर ह्यातल्या बऱ्याचशा चिनी किंवा नेपाळी बनावटीच्या वस्तू काही आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाच्या नव्हता. त्याच तोडीच्या वस्तू सगळीकडे मिळतात. पण ‘इतकं लांब आलोय, काहीतरी न्यायला पाहिजे’, अश्या विचाराने की काय पण यात्रींनी अगदी चढाओढ लावून, हिरीरीने जाकिटे व ब्लँकेट्सची खरेदी केली. बाकीच्यांबरोबर दुकानात फिरताना माझ्या सामानाचा ढीग डोळ्यासमोर येत असे! त्यात अजून भर घालायची हिंमत होत नव्हती. सामान खेचराच्या पाठीवर बांधून नेलं जातं. त्यामुळे नाजूक-साजूक गोष्टीं नक्कीच तुटल्या असत्या. असा सगळा शहाण्यासारखा विचार करून मी काहीच घेतलं नाही.  


दिनांक १ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)



ज्या अमावास्येच्या अंघोळींवरून मानससरोवरच्या काठावर वादावादी झाली होती, ती अमावस्या आज होती. बॅचमधले ८-१० लोक जीपने मानसच्या स्नानासाठी जाणार होते. ते आल्यावर दुपारी सगळ्यांनी मिळून तिबेटमधील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या खोजरनाथ मंदिराच्या दर्शनाला जायचे होते.

आज आमचा नेपाळी स्वैपाकी बहुधा चांगल्या मूडमध्ये असावा. त्याने आज नाश्त्याला ‘आलू पराठे’ करायचा घाट घातला होता. बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान चविष्ट खायला मिळणार, म्हणून सगळे घाईघाईने डायनिंग हॉलमध्ये पोचले. पण, त्याचा पराठे बनवायचा वेग आणि ५० यात्रींचा खाण्याचा वेग ह्यात फारच फरक पडायला लागला. पुष्कळ दिवस चालण्याचा व्यायाम झाल्याने सगळ्यांच्या भुकांमध्ये चांगलीच वाढ झाली होती. त्या बनवणार्‍याची बिचाऱ्याची तिरपीट होऊ लागली.

आम्ही दोन-दोन पराठे खाऊन उठलो. पण सगळे थोडीच हार मानणार होते. त्या जेवणाच्या हॉलमध्ये पराठ्यांवरून युद्ध सुरू झालं. बोलाचाली, शिव्यागाळीपर्यंत गोष्टी आल्या. बघताना लाज वाटत होती, पण मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही. शेवटी दुसऱ्या काही यात्रींनी मध्यस्थी केली आणि वाद शमला.


आजची सकाळ मोकळीच होती. आम्ही रिकामे लोक परत तकलाकोट दर्शनाला आणि लोक काय खरेदी करताहेत ते बघायला जाऊन जेवायच्या वेळेपर्यंत परत आलो. तोपर्यंत मानसला गेलेले यात्रीसुद्धा परत आले होते. जेवणाआधी नारंग सरांनी सगळ्यांची सभा बोलावल्याचा निरोप मिळाला.


इतके दिवस सगळ्यांच्यात मिळून-मिसळून वागणाऱ्या, विसरभोळेपणा करणाऱ्या सरांचा आज वेगळा रंग बघायला मिळाला. कोणावरही दोषारोप न करता, किंवा आक्रस्ताळेपणा न करता, त्यांनी सकाळच्या प्रकाराबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘आपण यात्रेला आलो आहोत, सहलीला नाही. पूर्वी उपाशीपोटीसुद्धा यात्रा कराव्या लागायच्या, आता तशी परिस्थिती नाही. पण थोडीशी अडचण झाल्यावर, परक्या देशात आपण अन्नावरून मारामारी करणे अत्यंत अयोग्य आहे. जर कोणाचे वर्तन चुकीचे वाटले, तर मी त्या यात्रीला परत पाठवू शकतो किंवा त्याला विदेश मंत्रालयाच्या काळ्या यादीत टाकू शकतो. काळ्या यादीत टाकल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा कधीही ह्या यात्रेचा विचारही करता येणार नाही. मला तसं करायला भाग पडू नका. इतके दिवस मजेत चाललेला हा प्रवास तसाच चालू द्या,’ अस सगळ्यांना बजावलं.

त्यांच्या ह्या संयत पण कठोर बोलण्याने सगळे सटपटलेच! सकाळी भांडण करणाऱ्यांनी एकमेकांची आणि बाकी यात्रींची माफी मागितली. त्या भांडणावर पडदा पडला, पुन्हा एकदा समजुतीच वातावरण कँपवर तयार झालं. जेवण झाल्यावर आम्ही खोजरनाथ मंदिराकडे जायला निघालो. हे बौद्ध मंदिर १२०० वर्षे जुने आहे. तकलाकोट पासून साधारण ३० किलोमीटरवर आहे. तकलाकोट सोडल्यापासून रखरखीत, धुळीने भरलेल्या आणि दुतर्फा डोंगर असलेल्या चढ-उताराच्या रस्त्यावरून आमची बस चालली होती. फक्त आम्ही ‘बस’लेलो असल्याने चढ-उताराची काळजी वाटत नव्हती!



हा मठ नेपाळच्या हद्दीपासून अगदीच जवळ आहे. इथला पुरातन मठ चिनी आक्रमणात उद्ध्वस्त केला होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. खोजरनाथचा भव्य मठ अतिशय आकर्षक आहे. गाभाऱ्यात मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात तीन भव्य मूर्ती अजूनच तेजःपुंज दिसत होत्या. ह्या मूर्ती अष्टधातुपासून बनवलेल्या आहेत व कमळावर आरूढ झालेल्या आहेत. डावीकडे अवलोकितेश्वर, मध्यभागी मंजुघोष आणि उजवीकडे वज्रपाणी अश्या तीन मूर्ती आहेत. काही जणांच्या मताप्रमाणे ह्या तीन मूर्ती राम, लक्ष्मण व सीतेच्या आहेत व ते रामाचेच मंदिर आहे. पण सगळ्या रचनेवर बौद्ध धर्माची छाप दिसत होती. त्याबरोबरीने, हिंदू धर्माचाही प्रभाव जाणवत होता.


उदबत्त्यांचा सुगंध, समयांचा मंद प्रकाश आणि साधकांच्या ध्यानधारणेसाठी मांडून ठेवलेली आसने, तिथली शांतता आणि शिस्त ह्या सगळ्यामुळे पावित्र्याची जाणीव होत होती. मठाच्या भिंतींवर बुद्ध जीवनावरची मोठमोठी रंगीत चित्रे काढली होती. बुद्ध मंदिराचे वैशिष्ट्य असलेली लहानमोठ्या आकाराची चक्रे, बाहेरील भिंतीला लागून होती.



लाल-किरमिजी अश्या सहसा न दिसणाऱ्या रंगसंगतीच्या ह्या मंदिरात आम्ही भरपूर फोटो काढून घेतले. बाहेर तिबेटी लोक त्यांच्या पारंपरिक वेषात आले होते. त्यांच्या बरोबरही फोटो झाले. पुन्हा बसमध्ये बसून आम्ही तकलाकोटला परतलो.

दिनांक २ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)



म्हणता म्हणता आमचा तिबेटमधल्या मुक्कामाचा शेवटचा दिवस उजाडला. आज तकलाकोट जवळच्या एक बौद्ध गुहा बघायला जायचं होत. बसची सोय होणार नाही. साधारण दोन किलोमीटर चालव लागेल, अशी कल्पना आमच्या गाइडने दिली होती. उद्या लीपुलेखला चालायचं होतं. परिक्रमा झाल्यापासून चालणं झालं नव्हत. तेवढेच पाय मोकळे होतील, ह्या उद्देश्याने सगळे यात्री वेळेच्या आधीच बूट चढवून तयार झाले होते.


तकलाकोटला एकाच वेळेला कडक थंडीही असायची आणि उन्हाचे चटकेही बसायचे. सगळ्या यात्रींचे चेहरे, विशेषतः नाक बघण्यासारखी झाली होती. सनस्क्रीन लावूनही चेहरे काळे पडले होते. पण त्यामुळे तरी घरी गेल्यावर घरचे लाड करतील, अशी मी आणि नंदिनी एकमेकांची समजूत घालत होतो!



आजही हवा छान होती. पाऊस नव्हता. त्याबाबतीत आम्ही नशीबवान होतो. यात्रा सुरू केल्यापासून पावसाने फार त्रास दिला नव्हता. आता उद्याही अशीच हवा असली, तर नबीढांगवरून ‘ओम पर्वताचे’ येताना राहून गेलेले दर्शन होईल, अशी चर्चा चालताना चालू होती. थोडक्यात सगळ्यांना आता मातृभूमीचे जोरदार वेध लागले होते. कैलास परिक्रमा झाल्यापासून एकूण यात्रेचा वेग तसा थंडावला होता. तिबेटमधले चौदा दिवसांचे वास्तव्य थोडे कमी केले तर चांगलं होईल, अस सगळ्यांनाच वाटत होत. अर्थात आम्हाला कुठेही निसर्गाच्या कोपाला तोंड द्यावं लागलं नव्हत. तशी काही परिस्थिती उद्भवली, तर घाई होऊ नये म्हणून कदाचित दोन दिवस जास्तीचे ठेवत असतील.


साधारण तासभर चालल्यावर आम्ही कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून त्या गुहांजवळ पोचलो. वाळूने बनले असावेत अश्या डोंगरात त्या गुहा होत्या. माझ्या मराठी डोळ्यांना ‘राकट, कणखर, दगडांचे’ डोंगर बघायची सवय, हे ठिसूळ डोंगर पाहून भीतीच वाटत होती. जोरात हाक मारली, तरी हे सगळं प्रकरण कोसळेल, अस वाटत होतं.


गुहा बघायला जाण्यासाठी एक शिडी चढून जायचं होत. वर गर्दी होईल, म्हणून १२ लोक एकावेळी सोडत होते. आमच्या बॅचचं एक माहितीपुस्तक करायचं, अशी एक कल्पना होती. खाली गप्पा मारत बसलेल्या यात्रींचे तावडेंनी त्यासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र फोटो काढले. (यात्रेहून परत येऊन महिने, वर्ष लोटली, तरी  अजून ते पुस्तक तयार होतच आहे!!)


आमचा नंबर लागल्यावर आम्ही वर गेलो. वरून तकलाकोटचे विहंगम दर्शन होत होते. लांबवर दिसत असलेले डोंगर बघून उद्या आपल्याला असेच डोंगर ओलांडायचे आहेत, हे लक्षात येऊन काळजी वाटत होती. थंड वाऱ्यावर थोडा वेळ थांबून आम्ही आत शिरलो. आत मंद दिव्याच्या प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. शांत-स्तब्ध वातावरणात सगळे तिथे थोडावेळ बसलो. गेल्या काही दिवसात आलेल्या विलक्षण अनुभवांची उजळणी सगळे आपल्या मनात करत होते.


परत कँपवर आल्यावर सगळे परत आपापल्या सामानाला भिडले. उद्या सामान दिल्यावर ते एकदम कालापानीला मिळणार होत. मानस सरोवराचे आणि गौरी कुंडाचे पानी सगळ्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून पॅकबंद केलं.

लीपुलेखच्या अवघड प्रवासात लागणारे, थंडीपासून बचाव करणारे कपडे, थोडा खाऊ, रेनकोट वगैरे आवश्यक गोष्टी जवळच्या लहान सॅकमध्ये भरल्या. मी सोबत बुटांचे दोन जोड आणले होते. त्यापैकी एक जोड तिबेटमध्ये येतायेताच फाटल्यामुळे फेकून दिला होता. काही कपडेही टाकून दिले होते. (बरेचसे ट्रेकर ट्रेकला जाताना जुने कपडे नेतात, आणि परत आणत नाहीत.) घरून आणलेलं खाण्याचं सामानही संपलं होतं. ह्या सगळ्यामुळे माझी मोठी सॅक थोडी हलकी झाली होती. तरटाच्या पोत्यात सहज जात होती. ती तशी कोंबून वर ठळक अक्षरात नाव घालून आम्ही आमचं सामान वेळेआधीच जमा केलं. खोली एकदम सुबक, सुंदर, देखणी दिसायला लागली! ज्या यात्रींच्या सामानात थोडी जागा शिल्लक होती, ते नव्या उत्साहाने शेवटची खरेदी करून आले. सगळ्यांची पारपत्रे आणि सामान जमा करून घेऊन नारंग सर आणि आमचे तिबेटी गाईड काही सोपस्कार पूर्ण करायला गेले.

ज्या यात्रींकडे चिवडा, खाकरा, फरसाण असा खाऊ शिल्लक होता, त्यांनी ते सगळा एकत्र केला. त्यात टोमॅटो, चटण्या घालून भेळ बनवली. (कांदा अजूनही निषिद्ध होता) सगळ्यांनी त्या भेळीवर दुष्काळातून आलेल्या माणसांच्या थाटात आडवा हात मारला!

संध्याकाळी एका छोट्या कार्यक्रमात आम्हाला दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे मिळाली. आम्ही सगळ्यांनी आमच्या दोन्ही गाइडचे मनापासून आभार मानले. आमच्या व्यवस्थेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. कालरा अंकलना दोन-तीन दिवस दवाखान्यात सलाईन लावून ठेवलं होत. आता ते पूर्ण बरे झाले होते. रात्रीच्या कार्यक्रमात ते सामील झाल्यामुळे सगळ्यांना खूप बरं वाटलं. नंतर हिंदी गाण्यांच्या तालावर मनसोक्त नाचून सगळे आपापल्या खोल्यांत शिरले.

दिनांक ३ जुलै २०११ (तकलाकोट ते गुंजी)



आज आपल्या देशात परत जायचं, ह्या कल्पनेमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. वेळेच्या आधीच चहा आणि जुजबी नाश्ता उरकून सगळे यात्री तयार होते. कँपच्या बाहेर सगळ्या बॅचचा, आमच्या तिबेटी गाईड व व्यवस्थापकांबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. जी थोडीफार गैरसोय, वादावादी झाली होती, त्याबद्दल कटुता न ठेवता, त्यांचे आभार मानून ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेव, ॐ नमः शिवाय’ च्या गजरात आम्हाला कैलास-मानस सरोवराचे दर्शन घडवणाऱ्या तिबेटचा निरोप घेऊन लीपू खिंडीकडे निघालो. बसच्या दार-खिडक्या बंद असल्या तरी तकलाकोटची थंडी अंगाला बोचत होती.


बाहेर आता परिचित वाटणारे दृश्य दिसत होते. हळूहळू उजाडू लागले होते. सगळे यात्री ते निर्मनुष्य अनोखे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होते. तेथील पिवळे, लालसर रंगांचे उंचच उंच डोंगर सूर्याच्या सोनेरी उजेडात जास्तच खुलून दिसत होते.

घोडेवाले यात्रींची वाट पाहत उभे होते. आमच्या सामानाची मोजदाद होऊन ते खेचरावर लादले गेले. चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आमची पारपत्रे कालच दिली होती. पुन्हा एकदा त्यांनी आमचे व्हिसाच्या कागदपत्रांवरचे आमचे फोटो, पारपत्रावरचे फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती निरखून, ताडून बघितल्या. ज्या व्यक्ती तिबेटात गेल्या त्याच परत जात आहेत, ही खात्री पटल्यावर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली.


पायीच जावे की काय, असा विचार होता. पण समोर असलेल्या बर्फाच्छादित उंच लीपुलेखकडे नजर गेल्यावर बहुतेक सगळ्यांनी घोड्यावर मांड टाकली. आतापर्यंतची यात्रा निर्विघ्नपणे झाली, आता हा परतीचा प्रवास तसाच होऊदे, अशी देवाची प्रार्थना करून प्रवास सुरू केला.


बघावं तिथे बर्फच बर्फ दिसत होते. त्या बर्फावरून एक काळी रेघ मारल्यासारखी पायवाट दिसत होती. त्या पायवाटेवरून आमचे घोडे एकमेकांच्या मागून आस्ते कदम चालू लागले. त्यातील काही द्वाड जनावरे वाटेतील घोड्यांना ढुशी मारून तर कधी बाजूने वाट काढत पुढे सरकू लागली, की सर्वच घोड्यांची चाल बिघडत होती. माझा घोडादेखील वेग वाढवू लागल्याने मी त्याचा लगाम जोरात ओढू लागताच दुखल्याने तो जास्तच वेगाने पळू लागला, आणि माझी अक्षरशः पाचावर धारण बसली. सुदैवाने वाटेत एक उंच चढण लागल्याने सगळ्यांचा वेग मंदावला आणि मला हायसे झाले. भारतातले पोनीवाले आपल्या सोबत चालतात. घोड्यांची टक्कर होऊ नये, म्हणून व्यवस्थित लक्ष ठेवतात. हे तिबेटी पोनीवाले मात्र एकीकडे बिड्या ओढत आमची तारांबळ बघत हसत होते.

आम्ही तिबेटमध्ये गेलो त्या दिवशीपेक्षा आज बर्फाच प्रमाण जास्त वाटत होत. घोड्यांचे पाय बर्फात रुतत होते. ओठ आवळले तरी दातावर दात आपटून आवाज येत होता. थोडं अंतर पार केल्यावर पोनीवाले आम्हाला उतरायचा आग्रह करू लागले. हो-नाही करत शेवटी बरेचसे यात्री उतरले. काही यात्री मात्र नाहीच उतरले. बॅचमधल्या ज्येष्ठ किंवा आजारी यात्रींना घोड्यावर बसू द्यावे, आणि जे चालू शकतात त्यांनी चालावे, हा साधा संकेतही लोक धुडकावून लावत होते. नारंग सर सगळ्यांच्या शेवटी होते. ते बिचारे ओरडून त्या यात्रींना ‘ आप प्लीज उतर जाईये, लेडीजको बैठने दिजीये|’ असं सांगत होते. काही जणांनी ते ऐकलं, पण काही जण हट्टाने नाही म्हणजे नाहीच उतरले. मूळचा मनुष्यस्वभाव कैलास-मानसच्या दर्शनाने बदलेल, अशी आशा ठेवणे, चुकीचंच होतं...


एक-एक पाऊल कष्टाने उचलावे लागत होते. श्वासाचा वेग आणि पावलांचा वेग व्यस्त प्रमाणात वाढत होते. अंगावर घातलेले यच्चयावत गरम कपडे आणि खांद्यावरच्या सॅकचा वजन जाणवत होत. कोणालाच एकमेकांशी बोलणं शक्य नव्हत. एरवी सगळ्यांची चेष्टामस्करी करणारेही शहाण्या मुलांसारखे एका रांगेत चालले होते.

लीपूखिंडीच्या उंच टोकावर काही काळ्या आकृत्या हालताना दिसल्यावर मागून कोणीतरी ओरडले, ‘हौसला रखो, अपना देश आ गया, वो देखो अपने जवान दिखाई डे रहे है|’ सगळ्यांच्या अंगात उत्साहाची नवी लाट आली. चिंचोळ्या वाटेची शेवटची जीवघेणी चढण आम्ही धापा टाकत चढत असताना पाचव्या बॅचचे यात्री, पोर्टर-पोनीवाले, आय.टी.बी.पी.चे जवान, अधिकारी सगळे ‘ॐ नमः शिवाय, भोलेबाबा की जय’ अश्या घोषणा देऊन आमचा उत्साह वाढवत होते. माझे पोर्टर-पोनीवाले सुरेश-रमेश ‘दिदी-दिदी’ हाका मारून मला हात करत होते. त्या सगळ्याचे आनंदी-उत्साही चेहरे पाहून आताच घरी आल्यासारखं वाटायला लागलं.

त्या संचारलेल्या मन:स्थितीत मी शेवटची पावले टाकली आणि एकवीस जून ते तीन जुलै एवढ्या दिवसांनंतर मायभूमीत प्रवेश केला.


ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा

भाग १० : लिपूलेख खिंड ते गाला https://aparnachipane.blogspot.com/2018/10/blog-post_30.html

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५