भाग-७ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) भाग-6 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा. https://aparnachipane.blogspot.com/2017/05/blog-post_17.html
द्वाली- धाकुरी (१५ जून २०१४)


मनासारखी झोप झाल्यावर सकाळी उठायला किती बरं वाटत. नाहीतर घरी झोपताना उशीर झाला, झोपायला हवंअसं म्हणायचं आणि उठताना उशीर झालं, उठायला हवंअसं. झोप पूर्ण झाली म्हणून उठायचं सुख गडबडीच्या दिनक्रमात फार वेळा मिळत नाही.

ट्रेकमधला सगळ्यात जास्त चालण्याचा दिवस आजचाच होता. आज तब्बल वीस किलोमीटर चालायचं होतं. स्वरुपने आम्हाला आदल्या दिवशी आपको तो जातेजाते रात हो जायेगी. बच्चे टाईमपे पोहोचेंगेअसा आशीर्वाद दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भराभर आवरून चालायला सुरवात केली.
पुन्हा तोच काफनी नदीचा डगमगता पूल पार केला. नदीच्या वाळवंटात पसरलेल्या दगडगोट्यांच्या रस्त्याने चालायला लागलो. इथे उभं राहिलं, की मागच्या जूनमध्ये दोन्ही नद्यांचं मिळून किती प्रचंड पात्र झालं असेल, ह्याचा आवाका डोळ्यासमोर येत होता. ते प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांना किती भीती वाटली असेल, ह्याचा अंदाज येत होता.


ट्रेकमधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कठीण लँडस्लाईड चढून आम्ही जंगलाच्या रस्त्याला लागलो. बऱ्याच जागी तो रस्ता तुटल्यामुळे नदीपात्रापर्यंत उतरायला लागायचं. त्या दगडधोंड्यांमधून थोडा वेळ चालून पुन्हा चढायचं आणि जंगलाच्या रस्त्याला लागायचं असा पॅटर्न होता.



असे रस्ते म्हणजे पायांना ब्लिस्टर्स यायला अगदी आदर्श परिस्थिती असते. चढताना दम लागतो, पण पायावर प्रेशर नसतं. उतरताना दम लागत नाही, पण गुढघे, पावलं थकतात, ब्लिस्टर्स यायला सुरवात होते. मला तर ब्लिस्टर्स झाले नाहीत, असा एकही ट्रेक नसेल. त्याच्यावर फार काही उपाय नाही, हेही स्वीकारलं आहे. चालणं कमी झालं की आपोआपच ते फोड बसतात. ह्या ट्रेकलाही काही वेगळी स्टोरी नव्हती. ब्लिस्टर्स आले होते, टोचत होते, सगळं नेहमीप्रमाणे होतं.


मंजिरीला जे ब्लिस्टर्स आले होते, ते मात्र भयंकर होते. दोन्ही अंगठ्यांच्या नखाखाली मोठे मोठे ब्लिस्टर्स आले होते. तसंच दडपून चालल्यामुळे ते चांगले मोठे आणि लालबुंद झाले होते. थोडक्यात सांगायचं, तर आलुबुखार असतात ना, तसे दिसत होते! ट्रेकमध्ये विनोद करायला कुठल्याही विषयाचं वावडं नसतं. मंजिरीच्या ब्लिस्टर्सचं नामकरण आलुबुखारअसं झालं. नंतर जीपमध्ये, ट्रेनमध्ये, कुठेही सगळे तिला सांभाळून गं बाई, आलुबुखारना धक्का लागेलअसं सांगत राहायचे.

हा शब्द खास ह्या ट्रेकच्या मराठीचा होता. असे भाषेचे वेगवेगळे आविष्कार सतत निर्माण होत होते. अनुजा परदेशात राहते. ती जरी मराठी उत्तम बोलत, वाचत असली, तरी इथल्या मुलांचं मराठी तिला शिकवायची जबाबदारी बाकीच्या मुलांनी घेतली होती. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. त्यातले कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘मॅगी / आइसक्रीम / चॉकलेट आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचंवगैरे सुविचार गरज असेल तसे कानावर पडायचे. शिवाय आम्ही नाही बाबा असला आचरटपणा करत’, ‘तू म्हणून ऐकून घेतलं, आपण नसतं ऐकून घेतलं’, ‘कसला स्टड आहे रे तूहे आणि असे असंख्य वाक्प्रचार मुलं वापरत होती! अनुजाच मराठी आता चांगलंच प्रगल्भ झालं आहे!!

चालताना आता आज आणि उद्याचा दिवसच चालायचं आहे. नंतर दोन दिवसात घरी जायचं असे विचार मनात डोकावायला सुरवात झाली होती. मनाचा खेळ किती विचित्र असतो नाही? ट्रेकच्या आधी कधी एकदा हिमालयात येतो आहे, असं झालं होतं आणि आता इथे घरी जायची ओढ लागली होती!


सकाळची ओलसर हवा होती. उजेड होता पण ऊन नव्हतं. पिंढारी नदीची सोबत होतीच. जाताना जिथे थांबून ब्रेकफास्ट केला होता, ती जागा आली. ठरल्यासारखे सगळे थांबले. पुरीभाजीचा ब्रेकफास्ट झाला. नदी अगदी जवळ होती. खळाळत धावणार पाणी बघताना मला त्या पाण्याची विलक्षण ओढ वाटते. त्या पाण्याचा स्पर्श, त्याचा वास, सहवास कसा असेल, अशी उत्सुक ओढ. त्या पाण्यात शिरण्याचा प्रयत्न म्हणजे जीवाशी खेळच. पण तरी ओढ जाणवते, हे मात्र खरं...

ह्या जागेनंतर चढ होता. इथून पुढे नदीपासून लांब जायचं होतं. तिचा तो सततचा नाद ह्यापुढे कमीकमी ऐकू येणार होता. मुलांना पुढे पाठवून आम्ही थोडा वेळ तो आवाज कानात साठवत तिथे बसून राहिलो आणि जड मनाने पुढे चालायला लागलो.

थोड्याच वेळात खाती कँप आला. इथे मुक्काम नव्हता. फक्त जेवणासाठी थांबायचं होतं. पुढच्या रस्त्यावर लँडस्लाईड नव्हत्या. त्यामुळे सामान खेचरांवर गेलं. जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने निघायचं असं ठरलं होतं. मुलांनी मग तो रिकामा वेळ खेचरांचं निरीक्षण करण्यात सत्कारणी लावला. खेचरांना हल्या थीरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रम्हणणे, जी ऐकून धावायला लागतील, त्यांनाच मराठी कळतं’ ‘कुठलं खेचर कोणासारखं दिसतंय, कोणाच्या वेगाने चालतंयवगैरे वगैरे!

निघायची वेळ झाल्यावर देवेन सरांनी अत्यंत चाणाक्षपणे धाकुरी कँपच्या स्वैपाक्याला फोन केला. हम लोग पाच बजेतक पहोच जायेंगे, पकोडे बनाके रखनाअसं आम्हाला ऐकू जाईल अश्या आवाजात सांगितलं. सगळे जण लगेचच मनातल्या मनात गरमागरम भजी खायला लागले! सरांची आयडिया एकदम बेस्ट होती. एका कँपला पोचलं, की पुढे चालायला जरा कंटाळाच येतो. पोट भरल्यानंतर वेगही मंदावतो. त्या परिस्थितीत भज्यांपेक्षा मोठं मोटिव्हेशन काय असणार? उत्साहाची नवी लाट आल्यासारखे सगळे पुन्हा चालायला लागले.

खेचरं आल्यामुळे स्वरूपचं काम संपलं होतं. आज तो आपल्या घरी जाणार होता. पाठीवर सामान असतानाही त्याची बडबड चालू होती, आता तर काय ओझं नसल्यामुळे तो आणखीनच खुशीत आला होता. काल त्याने आम्हाला त्याच्या कुटुंबाबद्दल, गावाबद्दल, त्याने केलेल्या ट्रेक-ट्रीप बद्दल इत्थंभूत माहिती दिली होतीच. आज त्याची रिव्हिजन घेतली आणि काही माहिती द्यायची राहिली असली, तर ती सांगून पोर्शन पूर्ण केला. धाप लागल्यामुळे आणि स्वरूपच्या ह्या चालत्या समालोचनामुळे, आम्हाला एकमेकींशी काही म्हणजे काहीही बोलता येत नव्हतं.... तो भाबडा, गरीब स्वभावाचा होता, त्याच्या मदतीशिवाय आम्ही ट्रेकमधले अवघड भाग पार करू शकलो नसतो, हे खरा होतं. पण म्हणून त्याने आम्हाला इतकाही पीळ मारायला नको होता!!



असं स्वरूपच प्रवचन ऐकत ऐकत आम्ही एकदाच मॅगी पॉइंटपर्यंत येऊन पोचलो. अपेक्षेप्रमाणे मुलांची मॅगी व कोल्ड्रिंकपार्टी चालू होती. तिथेच एक छोटंसं दुकान होतं. त्यात खरेदी करून स्वरूप घरी जाणार होता. आम्हाला हुश्श झालं. पण निरोप घेताना जरा वाईट वाटतच. तसं थोडं वाईटही वाटलं.
पिवळ्या ग्रुपचे काही सदस्य इथे येऊन पोचले. 

त्यांच्याकडून असं समजलं, की त्यांचा ट्रेक इथेच संपणार होता. ते इथूनच बागेश्वरला जाणार होते. ही आयडिया आम्हाला सुचली नव्हती, किंवा असा जीप पॉइंट मध्ये कुठेतरी असेल, असं माहितीही नव्हतं. नाहीतर प्रवासाचा एक दिवस कमी करता आला असता. त्या एक दिवसाचं महत्त्व आमच्यापेक्षाही अश्विनीला जास्त होतं. घरी पोचल्यानंतर तिच्या सुट्टीचे पाच-सहा दिवसच शिल्लक होते आणि साधारण दहा-बारा दिवसांची कामं! एक बोनस दिवस तिला नक्की आवडला असता. पण आता हा विचार करून काही उपयोग नव्हता. आमच्यानंतर कोणी जाणार असेल, तर त्यांना मात्र मी त्या जागी ट्रेक संपवायचा सल्ला नक्की देईन.

मुलांची पार्टी संपल्यावर पुन्हा चालायला सुरवात झाली. ह्या गावापासून धाकुरी कँपपर्यंत सणसणीत चढ आहे. गेले पाच-सहा दिवस चालून पायांची शक्ती जरी वाढली असली, तरी थकायलाही झालं होतं. धापा टाकत पावलं उचलायला लागलो.

चढ मजबूत होता. रस्त्यालगत लहान वस्त्या, शेतं, शाळा होत्या. पार संध्याकाळ झाली नव्हती पण दिवस हळूहळू कलत होता. गाई-बैल रस्त्यात घरच्यासारखे फिरत होते. त्यांच्यापासून लांब राहताना सगळ्यांचीच तारांबळ उडत होती. मेंढरांचे मोठे मोठे कळप जा-ये करत होते. मेंढरांचा आवाज बऱ्याचदा लहान मुलांच्या ओरडण्यासारखा वाटत होता. सगळी मेंढरं एकदम ओरडायला लागली, की डेसिबल लेव्हल चांगलीच असते. आमची मुलंही त्या आवाजात आपला आवाज लावून घेत होती!!

आम्ही प्राथमिक शाळेत असताना बाई पाढे म्हणायला सांगायच्या. सांगणाऱ्याने चूक केली, की म्हणणारेही चुकायचे. तेव्हा आमच्या अत्यंत प्रेमळ अशा बाई अजूनच प्रेमळ आवाज काढून मेंढरं आहात तुम्ही मेंढरं. एकाने खड्ड्यात उडी मारली, की मागची मेंढरंही मारतात उड्या. तुम्हीही तसलीच आहातअसं प्रेमळपणे म्हणायच्या, ती कडू आठवण आली...


असं खूप खूप खूप वेळ चालल्यावर धाकुरी कँप दिसायला लागला. मुलांच्या सपाट्यातून वाचलेल्या स्ट्रॉबेरीज खात, थांबत, धापा टाकत, दमत, थकत एकदाचे आम्ही सगळे कँपवर पोचलो. दुपारपासून वाट बघत होतो, ती भजी खाल्ली. चहा-कॉफी झाली. कोणाला किती ब्लिस्टर्स आले आहेत ह्याची पाहणी करून झाली.

ह्या कँपवरच्या लोकांना आम्ही भरपूर चालून थकून आलोय, ह्याची कल्पना होती. त्यांनी चुलीवर पाणी तापत ठेवलंच होतं. सगळ्यांना एक-एक बादली गरम पाणी मिळालं. बऱ्याच दिवसांनी अंघोळ केल्यावर चालण्याने आलेला शीण खूप कमी झाला.
जेवणानंतर पुन्हा एकदा मुक्ता आणि अभिरामची शास्त्रीय गायनाची मैफल जमली. कोणतीही साथ नव्हती. फक्त मोबाइलवरचा तानपुरा. तेवढ्या सुरावर दोघही इतकं सुंदर गायली, की बस्स! कान तृप्त झाले. मजा आली.

धाकुरी- बागेश्वर (१६ जून २०१४)

मला लवकर जाग आली, झोप लागेना. बाहेर उजाडलं होतं. पाऊस जोरात पडत होता. व्हरांड्यात येऊन पाऊस बघत मी शांत बसून राहिले. मागच्या वर्षी उत्तराखंडात झालेल्या प्रलयाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत होतं. त्या दिवसांत ह्या राज्यातल्या लोकांनी फार सोसलं, त्याचं वाईट वाटत होतं. त्यासोबतच आमचा इथपर्यंतचा प्रवास अगदी ठरवल्यासारखा झाला, कुठे काही गडबड झाली नाही. आता ह्या कोसळणाऱ्या पावसामुळे काही गालबोट तर लागणार नाही ना? अशी काहीशी स्वार्थी भीतीही वाटत होती.

ह्या ट्रेक आम्ही आमच्या हिमतीवर करत होतो. त्याचा चांगला भाग आतापर्यंत अनुभवत होतो. एखाद्या ठिकाणी थांबावंसं वाटलं तर हल्या-हल्या करणार कोणी नव्हतं, चार पैसे जास्त-कमी खर्च केल्यावर कोणाला उत्तर द्यावं लागत नव्हतं. मुलग्यांची खोली नेहमी वेगळी असली, तरी घरचीच मुलं असल्याने संकोच वाटायचं काही कारणच नव्हतं. त्यांची खोली लहान असली, तर एक-दोघं आमच्या खोलीत झोपायला यायची. घाईच्या वेळेत आम्ही त्यांच्या खोलीतली बाथरूम वापरायचो. सगळ्याच बाबतीत मोकळेपणा होता.

पण फक्त स्वातंत्र्य कधीच मिळत नाही. त्याबरोबर जबाबदारी येतेच. इथेही सर्व मंडळी ठरलेल्या शेड्यूलनुसार नीटपणे घरी पोचेपर्यंत जबाबदारी होतीच. जबाबदारी कोणाच्या एकाच्या डोक्यावर नव्हती आणि काही शेड्यूलमध्ये काही अपरिहार्य बदल करावे लागले तर कोणी कोणावर दोषारोप करणार नाही, ह्याची अगदी पक्की खात्री होती. तरी एकमेकांजवळ ह्याबाबतीत बोललं नाही, तरी प्रत्येकाच्या मनावर तो ताण होताच.

आज चौदा किलोमीटर चालायचं होतं. दहा किलोमीटर लोहारखेतपर्यंत आणि चार किलोमीटर सॉंगपर्यंत. तिथे जीप येणार होत्या. रात्री मुक्कामाला बागेश्वर. हिमालयाच्या सुखद गारव्यातून गरमीत जायचं होतं. त्याबरोबर शहरी फायदेही मिळणार होते. टीव्ही, मोबाईल फोन, वीज, बाथरूम, बाटलीबंद पाणी.. पण हा सुखद, सहज सहवासही संपणार होता. मुलांसकट सगळ्यांचेच व्यस्त दिनक्रम, कौटुंबिक व्यावसायिक जबाबदाऱ्या... पुन्हा कधी असा मेळ जमून येणार? असं वाटत होतं. मुलांनी मात्र आता दर वर्षी असं कुठेतरी जायचंच असा ठाम निश्चय केला होता. अनुजाला हे असं वातावरण आवडेल की नाही, अशी भीती होती. पण ती आई नाही आली तरी मी एकटी तुमच्याबरोबर येईन’, असं म्हटल्यावर हा सगळा खटाटोप सत्कारणी लागला, असं वाटत होतं.

उजाडल्यावर थोड्या वेळाने पाऊस कमी झाला. हलकं ऊन पडलं. बाहेरच्या गवतावर पावसाचे थेंब चमकायला लागले. नेहमीप्रमाणे चहा, नाश्ता, सॅकमध्ये सामान कोंबणे, काहीतरी विसरणे, सामान पुन्हा उपसणे, बूट-टोप्या-गॉगल चढवणे वगैरे रोजचे एपिसोड्स पार पडले. फोटो काढून झाले, सामान खेचरांच्या पाठीवर गेलं. एका खेचरवाल्याच्या बोटाला मोठी जखम झालेली पाहून अश्विनीने परिस्थिती हातात घेतली. प्रथमोपचाराचे सामान सॅकमधून उपसून मलमपट्टी करून दिली. फार वर्षांपूर्वी आम्ही चंद्रखणी पासचा ट्रेक एकत्र केला होता. अवघड रस्ता, पावसाचा कहर ह्यामुळे बॅचमधल्या बऱ्याच जणांची पडझड झाली होती. अश्विनी एकदम फुल डिमांडमध्ये! ह्या टेंटमधून त्या टेंटमध्ये ह्या डॉक्टर मॅडम हिंडत होत्या, त्याची आठवण आली.

धाकुरी कँपकडे डोळे भरून बघत आम्ही सगळे चालायला लागलो. रस्ता माहितीचा होतं. कँपनंतर एका देवळापर्यंत चढ आणि मग पार सॉंग गावापर्यंत उतार आहे. लोहारखेतपर्यंतचा रस्ता अतिशय सुंदर आहे. जंगल, मोठे वृक्ष, वाहणारे झरे, हिरवी पठारे, लांबवर दिसणारी पर्वतशिखरे आणि त्यावरची लहान-लहान गावे अशी डोळ्यांना मेजवानी होती. घाई करायचं काही कारण नव्हतं, त्यामुळे निसर्गाची मजा घेत आणि मनात-डोळ्यात हे सगळं साठवत आम्ही चालत होतो.


देवळापाशी आल्यावर बी.ऐसं.एन.एल. च्या फोनला रेंज येते आहे, असं कळलं. मी एकटीच बी.एस.एन.एल. वाली. मग पूर्वी एस.टी.डी. बूथवर जश्या रांगा लागायच्या, तश्या माझ्या फोनसाठी लागल्या. घरची खबरबात कळली, मुलांचे फुटबॉल वर्ल्डकपचे अपडेट घेऊन झाले तसे आम्ही लोहारखेतची वाट चालायला लागलो. साधा, उताराचा रस्ता होता. बिकट वाट नसल्याने चालायचे श्रम वाटत नव्हते. तरीही आम्ही थांबत-फोटो काढत-गप्पा मारत चाललो होतो. पाऊस नव्हता पण धुकं होतं. धुक्यात तो रस्ता अजूनच सुंदर वाटत होता.

मजा करत करत आम्ही शेवटच्या मॅगी पॉइंटपर्यंत येऊन पोचलो. प्रथेप्रमाणे मॅगी खाऊन झालं. आतापर्यंत सगळ्या मॅगी पॉइंटवर मुलांनीच मॅगी खाल्लं होतं. नुकतंच जेवण झालंय किंवा कँप जवळच आलाय किंवा चालताना जड होईल, अश्या कारणांनी आम्ही खाल्लं नव्हत. आता परत हे हिमालयन मॅगी मिळणार नाही, म्हणून आम्हीही ती फोडणीवाली मॅगी खाऊन पहिली. त्या ठिकाणी, त्या हवेत, मैत्रीणींच्या सहवासात ती अत्यंत चविष्ट लागली!

थोड्या वेळाने मातीचा रस्ता संपून दगडांचा रस्ता सुरू झाला. चढताना ह्याच रस्त्याने गेलो होतो. पण तेव्हा पायांवर जोर येत नसल्याने त्या दगडांचा काही त्रास झाला नव्हता. आता उतरताना ते दगड पायांना खूपच टोचत होते. त्यातून ब्लिस्टर्सच्या जागी टोचले की नको ते शब्द तोंडात नाही, तरी मनात नक्की येत होते! असे उभे दगड खेचरांचे पाय घसरू नयेत म्हणून लावतात म्हणे. पण माणसांच्या पायांचा काही विचार? माणसांच्या पायांच्या चाळण्या होतात त्याचं काय? इथली माणसं खेचरांवर बसून उतरतात असतील कदाचित!



तर, अश्या ह्या टोचऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आम्ही सर्व मंडळी लोहारखेतला येऊन पोचलो. जेवण तयारच होतं. आपण आता शहराच्या जवळ जात आहोत ह्याची जाणीव वॉश बेसिनमुळे पक्की झाली. कारण बेसिनचा नळ फिरवल्यावर पाणी येत होतं आणि पाइपमधून अदृश्य होऊन वाहूनही जात होतं. ह्या दोन्ही सोयी एकाच जागी आहेत, हा अनुभव बऱ्याच दिवसांनी मिळाला. इतके दिवस नळ, त्याला तोटी, तोटी फिरवल्यावर पाणी येणे आणि ते पाणी नीटपणे वाहून जाणे असे सगळे घटक एकावेळी कधीही नव्हते!

आता पुढचा आणि शेवटचा टप्पा फक्त तीन किलोमीटरवर होता. त्या गावाचं नाव सॉंगअसं होतं. मग त्या नावावरून गाव आहे की सोंग?’ त्या गावातल्या बायका नवऱ्याला आलं बाई आमचं सॉंगचं सोंगअसं म्हणत असतील का? इत्यादी विनोद करून पोट दुखेपर्यंत हसून झालं. ट्रेकच्या शेवटी जे विनोद होतात, ते उच्च कोटीचे नसले, तरी सर्वांना हास्य-रोग झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दाद मिळतेच, असा माझा तरी अनुभव आहे.

लोहारखेत ते सॉंगच्या रस्त्यावरही आधीच्या रस्त्यासारखे दगड होते. चालताना वाईट टोचत होते. गप्पा मारण्याची कोणाचीच मन:स्थिती नव्हती. रस्त्याला जोरदार उतार होता. खरं तर ट्रेकची सुरवात सॉंगपासूनच होते. आम्हाला बागेश्वरला पोचायला उशीर झाल्याने आम्ही हा टप्पा जीपने गेलो होतो. हे चढताना किती वाट लागली असती, असं प्रत्येकालाच वाटत होतं. होता है वो भले के लिये’. त्या दिवशी उशीर झाला ते बरंच झालं, असं आता कळलं!







त्या दगडांवरून उतरत एकदाचे सगळे जीपपर्यंत येऊन पोचले!!! मंजिरी तिचे आलुबुखार सांभाळत, वेदना सहन करत चालत होती. तिचा हिमालयातला पहिलाच ट्रेक होता. इतका त्रास होत असूनही तक्रार किंवा कुरकूर न करता तिने तो पूर्ण केला. त्याबद्दल तिला तिथलीच रानफुले बक्षीस देण्यात आली. चालण्याचे बूट काढून मी फ्लोटर्स घातले. पावलांना इतकं सुख वाटलं, की विचारता सोय नाही. दोन जीप आलेल्या होत्या. नेहमीप्रमाणे मुलं एका जीपमध्ये आणि आम्ही दिदी लोगदुसरीकडे अशी विभागणी झाली.

उत्तराखंडातील रस्त्यांवरून जीप घरंगळायला लागल्या. नेहमी असतो, तसाच सीन होता. एकीकडे नदी, दुसरीकडे डोंगर. आम्ही नुकतीच स्वच्छ, सुंदर, निर्मळ पाण्याची नदी बघून आलो होतो. नदी माणसात आल्यावर तिची झालेली केविलवाणी अवस्था पाहवत नव्हती. आमच्या जीपचा ड्रायव्हर गाडी चालवताना देऊळ दिसल्यावर गाडीत टांगलेली घंटा तर वाजवत होताच. पण एकसारखा खिडकीतून डोकं बाहेर काढून वाकून चाकांकडेही पाहत होता. तो असं का करत असेल, हे काही आम्हाला कलत नव्हत.

मध्ये एका ठिकाणी रस्त्याचं डांबरीकरण चालू असल्यामुळे आमच्या गाड्या थांबल्या. ड्रायव्हर लोकांना गाडी थांबवावी लागली, की गाडीत बसून राहायला बंदी असते, त्यामुळे आमचा शिवराम गोविंदखाली उतरला. तो आणि बाकी सगळे ड्रायव्हरही आमच्याच जीपच्या चाकांकडे पाहत होते. मुलांच्या जीपच्या ड्रायव्हरला विचारल्यावर आपके गाडीके टायर पुरे गंजे हो गये है, ये पागल वैसेही चला रहा हैअशी माहिती मिळाली.. झालं. गंजे टायरह्या शब्दाची संग्रहात भर पडली आणि काळजीच्या भुंग्याची गुणगूण डोक्यात सुरू झाली.

सुदैवाने त्याच टक्कलवाल्या टायरवर आम्ही बागेश्वरला येऊन पोचलो. अरुंद रस्ते, भरपूर रहदारी, हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज, उकाडा, गर्दी... जीप परत वळवून पुन्हा लोहारखेत नाहीतर धाकुरीला जाऊन राहावं अस फारफार वाटलं. पण तसला काही आचरटपणा न करता बागेश्वर कँपला पोचलो. तिथे त्यांनी नऊ लोकांसाठी पाच खोल्या दिल्या, पण आम्हाला आता एकमेकांची इतकी सवय झाली होती, की अत्यावश्यक गोष्टी आटपून आम्ही एकाच खोलीत गर्दी करून बसलो!

त्या दिवशी सगळ्यांनी इतका वेळ अंघोळी केल्या, की बागेश्वरमध्ये दुसऱ्या दिवशी नक्की पाणीकपात जाहीर करावी लागली असेल. ट्रेकमधल्या कँपच्या मानाने इथली सोय चांगली होती. मुलांच्या अपेक्षा ट्रेकनंतर इतक्या खाली आल्या होत्या, की तो कँप त्यांना पंचतारांकित सोयीचा वाटत होता.
रात्री जेवताना उद्या काठगोदामला जाताना थोडा वेळ नैनितालला थांबायचं असं ठरलं. प्रवास केलेल्या वाहनांच्या यादीत होडीची भर पडली असती आणि वरण-भात-भाजी-पोळीच्या जेवणाला कंटाळलेल्या मुलांना पिझ्झा वगैरे पौष्टिक अन्न खायला मिळाल असता.

इतक्या दिवसांचं चालणं, स्वच्छ अंघोळ, जेवण. थकवा अगदी दाटून आला होता. जेवण झाल्यावर खोलीत न जाता, इथेच पसरावं असं वाटत होतं. ट्रेक संपला की चटकन घरी पोचायची सोय असायला पाहिजे. पण तसं कधी होत नाही. आम्हालाही अजून काठगोदामपर्यंत जीप, मग रात्रभर ट्रेन, दिल्लीतले कंटाळवाणे काही तास मग विमान, इतके टप्पे पार केले, की मग घर दिसणार होत..

सध्या मात्र फार मानसिक किंवा शारीरिक कसरत करण्याच्या स्थितीत कोणीच नव्हत. सगळे कसेबसे खोलीत पोचले आणि गाssssढ झोपले.

आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक) अंतिम भाग-8 वाचण्यासाठी पुढील दुव्यावर टिचकी मारा.

Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५