मला आवडलेलं पुस्तक - काबूलनामा

माझ्या आवडत्या लेखिका गौरी देशपांडे ह्यांच्या लेखनाबद्दल वाचण्यासाठी कृपया येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद. 

गौरी नावाचं गारुड https://aparnachipane.blogspot.com/2017/03/blog-post.html


मराठी माणसाची साधारण प्रवृत्ती ही आपल्या पंचक्रोशीत रमण्याची. पण दोन पिढ्यांमागे भाकरीच्या शोधात मूळ गाव सोडून शहराकडे धाव घेणे, हे अपरिहार्य झाले. तरीही बहुधा परिघ मुंबई-पुण्यापर्यंतच राहिला. त्या काळात श्री. फिरोज म्हणजेच पंढरीनाथ रानडे दिल्ली, कलकत्ता, शिलॉंग अश्या सुदूर ठिकाणी कामानिमित्त्य राहिले. तिथल्या अनुभवांनी त्यांचे विश्व विस्तारले गेले. त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे ह्यांनी व स्वतः रानडे ह्यांनी त्या अनुभवांवर लेखन केले. श्री. रानडे ह्यांच्या ‘काबूलनामा’ ह्या पुस्तकाविषयी माझे चार शब्द....

काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानची खरं म्हणजे कुठलीच प्रतिमा डोळ्यासमोर नव्हती. नंतर अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर ‘तालीबान, बॉम्बस्फोट, रायफली, निळ्या बुरख्यात लपेटलेल्या स्त्रिया, बामियानच्या उद्ध्वस्त बौद्ध मूर्ती आणि निर्वासितांचे लोंढे’ अस उदास, राखी रंगातलं चित्र उभं राहू लागलं. तेव्हाच कधीतरी हे पुस्तक हातात पडलं. तेव्हाच्या सुंदर, मोकळं वातावरण असलेल्या अफगाणिस्तानच वर्णन वाचून आश्चर्यच वाटलं.

श्री.रानडे पेश्याने आर्किटेक्ट होते आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी होते. १९७७ ते १९८१ ह्या काळात ‘आयटेक’ ह्या भारत सरकारच्या योजनेअंतर्गत अफगाणिस्तानात काबूल येथे आपल्या कुटुंबासमवेत राहिले. त्यांच्याबरोबर बँक कर्मचारी, आर्कीऑलॉजीस्ट, संगीत शिक्षक, हॉकी कोच ह्या आणि अश्या विविध पेश्यातली बरीच भारतीय लोकं काबूलमध्ये होती. नुसते ‘होती’ अस नाही, तर बहुतेक सर्व मंडळी तिथल्या आरामशीर आयुष्याच्या प्रेमात पडून जास्तीत जास्त राहण्याच्या प्रयत्नातही होती.

रानडे काबूमध्ये होते, त्या काळातल्या जनजीवनाच, अफगाणी लोकांच्या चालीरीती, त्यांच्या राहणीच फार छान वर्णन ह्या पुस्तकात आलं आहे. तिथले रस्ते, बाजार, इमारती, रानड्यांचा ऑफिसमधील भारतीय तसेच अफगाणी सहकारी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.

आज सामान्य माणसाला अफगाणिस्तानात जाण्याची कल्पनाही भीतिदायक वाटेल. पण तेव्हा तिथे बुरखाधारी स्त्रिया क्वचितच दिसायच्या. स्त्रियांमध्ये शिक्षणाच प्रमाण चांगलं होत. सर्व ऑफिसांमध्ये नोकऱ्या करणाऱ्या स्त्रिया दिसत असत. पण माणसाच किंवा वास्तूंचं आपलं एक नशीब असत, अस म्हणतात. ग्रह फिरावे, तसं त्याचं नशीबही फिरत असावं अस काहीकाही उदाहरणांवरून वाटतही. तसंच देशाचंसुद्धा बहुधा असावं. नाहीतर ज्या देशात बायका  अद्ययावत पोशाख करू शकत होत्या, सार्वजनिक कार्यक्रमात गाऊ शकत होत्या, शिकू शकत होत्या, तिथेच स्त्रियांना मध्ययुगाच्या काळोखात ढकलण्यात आलं. काळाच्या आधुनिकतेच चक्र अस उलट फिरलंच कसं, असा अचंबा वाटतो.

रानडे कुटुंबीयांच्या चार वर्षांच्या वास्तव्याच्या काळात अफगाणिस्तानात बरीच राजकीय उलथापालथ झाली.  राजकीय उठाव, कम्युनिस्ट क्रांती, रशियन सैन्य येणे अश्या तिथल्या जनजीवनावर आणि जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणाऱ्या घटना घडल्या. रानडे दांपत्याने ह्या घटना जवळून आणि त्यात रस घेऊन बघितल्या. ‘आपण इथे थोडे दिवस राहणार आहोत, आपला काय संबंध?’ असा अलिप्त विचार न करता, सामान्य अफगाण माणसांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले. फारसी भाषा, अफगाण संस्कृती आणि तिथले रीतिरिवाज ह्यात समरस झाले. तिथलं भारतापेक्षा खूपच वेगळं असलेलं समाजजीवन, तिथले वेगवेगळे वंश, अफगाण माणसाच्या आयुष्याचा तानाबाना त्यांनी समजून घेतला.

रस्त्याकडेचा चांभार, सामान्य टॅक्सीवाला, रानड्यांचे घरमालक ह्यांच्यापासून ते त्यांच्या ऑफिसमधील सहकारी असलेल्या एका अमीरपुत्रापर्यंत सर्वांशी त्यांनी मैत्री जोडली होती. रशियन सैन्याच्या आगमनानंतर तोपर्यंत कोणाचीही गुलामी न केलेले, स्वतंत्र बाण्याचे अफगाण लोकं खूपच दुखावले गेले. सगळीकडे संशयाचं, भीतीचं, असुरक्षिततेच भयाण वातावरण तयार झालं होत. रानडे त्याविरुद्ध काही करू शकत नव्हते. पण त्यांच्या परिचयातल्या माणसांना त्यांच्याशी मोकळेपणाने, विश्वासाने बोलत येत असे , मनातली खळबळ व्यक्त करता येत असे. तेवढी जागा त्यांनी अफगाण मित्रांच्या मनात निर्माण केली होती.

त्यांच्या लिखाणात त्यांच्या उत्साही, रसिल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय जागोजागी येतो. त्यांनी जी वेळ, जसा प्रसंग समोर येईल त्याचा मनापासून आनंद घेतला. मग राजकीय उठाव झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बायको-मुलांबरोबर पूर्वीचा राजवाडा बघायला जाणे असो किंवा रशियन घुसखोरीविरुद्ध निघालेल्या मिरवणुकांत भाग घेणे असो.

रानड्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त! त्यामुळे अनेक गमतीदार प्रसंग त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याबद्दल लिहायचं, तर सगळं पुस्तकच लिहून काढावं लागेल. उदाहरण म्हणून एकच लिहिते. काबूलमध्ये हिंदी सिनेमा अत्यंत लोकप्रिय होता. प्रत्येक दुकानात हेमामालिनीचा फोटो आणि शेजारी देशप्रमुखाचा फोटो दिसायचा. तिथे देशप्रमुख बदलला, की नव्या प्रमुखाचा फोटो त्वरित लावावाच लागतो. त्यात चालढकल केल्यास देहदंडही होऊ शकतो. रानडे तिथे होते, तेव्हा चार देशप्रमुख बदलले. ते फोटो बदलत गेले, तरी हेमामालिनीचा फोटो मात्र कायम होता!

काबूलमध्ये त्यांचा वकिलात, राजदूत आणि तेथील यंत्रणा ह्यांच्याशी अर्थातच निकटचा सबंध आला. त्या सगळ्या लोकांचे आणि तिथे राहणाऱ्या हिंदी लोकांचे अत्यंत मनोरंजक वर्णन त्यांच्या पुस्तकात आहे. ते काबूलमध्ये  होते तेव्हा त्यांच्या घरी श्री.माधव गडकरी, ज्येष्ठ गांधीवादी श्री.हरीभाऊ जोशी, तसेच सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान पाहुणे म्हणून येऊन गेले होते. 
   
पेश्याने आर्किटेक्ट असल्याने काबूलच्या नगरपालिकेत काम करताना त्यांनी हाताळलेले विविध प्रकल्प, त्या संबंधाने येणारे प्रश्न, रशियन लोकांबरोबर झालेले वाद ह्याच चांगलं खमंग वर्णन ह्यात वाचायला मिळत. एक जुनी मशीद समोरचा रस्ता रुंद केल्यामुळे पाडली जाणार होती, ती वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, हे सगळं वाचलं की त्यांचं त्यांच्या कामावर किती प्रेम होत ते कळत. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाचा धर्म ‘त्याच काम’ हा होतो. त्या माणसाला देशाच्या, धर्माच्या रूढ भिंती दिसेनाश्या होतात.

अफगाणिस्तान हा आपल्या जवळचा देश. वर्षानुवर्षे युद्ध, बंडाळ्या, परदेशी आक्रमणे ह्यांनी पोखरला गेलेला. टोळ्या, वंश ह्यात विखुरलेली जनता. 'एक देश, एक झेंडा' ह्या कल्पनांपासून काहीसा लांब. काहीसे क्रूर पण पराकोटीचे अभिमानी असे लोक. तालीबानच्या राजवटीत मोकळेपणाने श्वास घेणंसुद्धा कठीण होत. एकेकाळी स्वातंत्र्य उपभोगलेल्या अफगाण लोकांनी हे सगळं कसं सोसलं असेल, कोण जाणे.

भारताची अफगाणी लोकांच्या मनातली प्रतिमा 'मोठा भाऊ' अशी होती. भारताच्या राजकारणात त्यांना खूप रस होता. तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी ह्या स्त्री असून इतक्या मोठ्या देशाच्या 'सुलतान' आहेत, ह्या गोष्टीचं सामान्य अफगाणी लोकांना आश्चर्यही वाटायचं आणि कौतुकही. कौतुक म्हणजे किती?, रानड्यांच्या ड्रायव्हरने त्याच्या मुलीच नाव 'इंद्रा गांधी' ठेवलं होत इतकं!!

अलेक्झांडर, मुगल आक्रमक ह्यांच्यापासून ते इंग्रज, रशियन फौजांपर्यंत कितीजण ह्या देशाला लुटायला आले आणि जाताना आपल्या संस्कृतीचा एक भाग इथेच सोडून गेले. ह्या सगळ्याच मिश्रण होऊन त्यात झाली ती अफगाणी संस्कृती. त्या संस्कृतीची अत्यंत जिव्हाळ्याने लिहिलेली झलक आपल्याला ह्या पुस्तकातून बघायला मिळते.

तिथली परिस्थिती दिवसेंदिवस पारच बिघडत गेली, त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव भारत सरकारने  सगळ्यांना परत बोलवायला सुरवात केली. रानड्यांचाही परतीचा कार्यक्रम ठरला. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव तिथे खरंच गुंतला होता. पुन्हा कधी भेटायची शक्यता दुर्मिळ आहे, ही जाणीव मनाला पोखरत असताना त्यांनी तिथल्या परिचितांचा, सहकाऱ्यांचा निरोप घेतला. पण आपल्याला मात्र पुस्तक संपवताना त्या सगळ्या रानड्यांच्या लेखणीतून ओळखीच्या झालेल्या लोकांबद्दल हुरहूर वाटत राहते.


मला आवडलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यासाठी येथील दुव्यावर टिचकी मारा. धन्यवाद!

ओपन (आंद्रे आगासी) https://aparnachipane.blogspot.com/2017/07/blog-post.html



Comments

Popular posts from this blog

मी वाचलेले पुस्तक : थिओडोर बून (स्कँडल) लेखक जॉन ग्रीशाम

गीतानुभव

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५